...तेव्हा डॉक्टरनेच घ्यावे ‘सेकण्ड ओपिनियन’
By Admin | Updated: July 20, 2016 02:23 IST2016-07-20T02:23:36+5:302016-07-20T02:23:36+5:30
डॉक्टरकडे गेल्यावर रुग्णाच्या तपासण्या झाल्यावर औषधोपचार सुरु केले जातात.

...तेव्हा डॉक्टरनेच घ्यावे ‘सेकण्ड ओपिनियन’
मुंबई : डॉक्टरकडे गेल्यावर रुग्णाच्या तपासण्या झाल्यावर औषधोपचार सुरु केले जातात. पण, काहीवेळा आजाराचे योग्य निदान झालेले नसते. त्यामुळे औषधे घेऊनही आजार बरा होत नाही. अशावेळी डॉक्टरच्याही लक्षात येते आजाराचे निदान होत नाही. अशावेळी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना अंधारात न ठेवता, डॉक्टरांनी स्वत: त्यांना योग्य वाटणाऱ्या डॉक्टरकडून सेकण्ड ओपिनियन घ्यावे, असा सूर ‘सर्वप्रथम अपाय नको’ या चर्चासत्रात उमटला.
परळच्या केईएम रुग्णालयातील ‘बायोएथिक्स युनिट’तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वंध्यत्व डॉ. अनिरुद्ध मालपानी लिखित ‘पेशंट सेफ्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. अविनाश सुपे उपस्थित होते. यानंतर ‘सर्वप्रथम अपाय नको’ याविषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात डॉ. फारूख उदवाडिया, डॉ.सुनिल पांड्ये, डॉ. यशवंत आमडेकर आणि डॉ. उर्मिला थत्ते सहभागी झाले असून डॉ. मालपानी यांनी सत्रसंचालकाची भूमिका बजावली.
या चर्चासत्रात डॉक्टर आणि रुग्ण यांचे नातेसंबंध, डॉक्टरांचे प्रश्न, डॉक्टरांच्या जबाबदाऱ्या अशा विषयांवर चर्चा करण्यात आली. रुग्ण बरा होणे, त्याला उत्तम उपचार मिळणे हे महत्त्वाचे असते. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांचा विचार करुनच उपचारपद्धती निवडली पाहिजे. एकाच रुग्णाला तीन ते चार अथवा अधिक डॉक्टर तपासत असतील तर या सर्वांमध्ये संवाद पाहिजे. त्या रुग्णाला दिलेली औषधे कागदावर लिहणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
कोणतीही चूक झाली, काही अंदाज चुकले तर त्यासाठी मी स्वत: जवाबदार आहे, असे प्रत्येक डॉक्टरला वाटले पाहिजे. माझ्याकडून चूक झाली तर पुढच्यावेळी तो रुग्ण माझ्याकडे येणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे असे मत डॉ. आमडेकर यांनी सांगितले. डॉ. थत्ते यांनी डॉक्टरांनी ‘मेडिकल एरर’ रिपोर्ट केले पाहिजेत असे सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात संशोधन पब्लिश देखील झाले पाहिजे. त्यामुळे अन्य डॉक्टरांना शिकता येईल.
डॉक्टरांनी रुग्णांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली पाहिजे. त्यामुळे रुग्णाचा डॉक्टरांवर विश्वास बसतो. त्यामुळे रुग्णासाठी उपचार सुकर होतात असे डॉ. मालपानी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
>डॉक्टर रुग्णांमुळे आहेत-पांड्ये
आपण रुग्णांमुळे आहोत हे सर्व डॉक्टरांनी लक्षात ठेवले पाहिजे. रुग्णांच्या हिताचा विचार सर्वप्रथम व्हायला पाहिजे. अनेक प्रश्न, समस्या आहेत. पण, त्या समस्यांचे पूर्णपणे निराकरण करणे शक्य नसले तरीही त्यातून मार्ग काढला पाहिजे. रुग्णांना याचा कमीत कमी त्रास कसा होईल, याचा विचार केला पाहिजे.
>तीन ‘सी’ महत्त्वाचे - उदवाडिया
केअर, कम्पॅशन आणि कम्युनिकेशन हे तीन ‘सी’ डॉक्टरसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे उदवाडिया यांनी सांगितले. आजार एकच असला तरीही रुग्णानुसार बदलतो. हे डॉक्टरने लक्षात ठेवले पाहिजे. आजार ओळखून उपचार केले पाहिजेत. प्रत्येक डॉक्टरने स्वत:च कोणते उपचार केले, औषधे का दिली हे लिहून ठेवणे आवश्यक आहे.