...तर आयपीसी ३०६ लावू नका
By Admin | Updated: December 30, 2015 01:17 IST2015-12-30T01:17:12+5:302015-12-30T01:17:12+5:30
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप एखाद्यावर नोंदवण्यापूर्वी संबंधिताने आत्महत्या करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप यापुढे पोलिसांना नोंदवावा लागणार आहे. एका इंजिनीअरची या आरोपातून

...तर आयपीसी ३०६ लावू नका
मुंबई : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप एखाद्यावर नोंदवण्यापूर्वी संबंधिताने आत्महत्या करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप यापुढे पोलिसांना नोंदवावा लागणार आहे. एका इंजिनीअरची या आरोपातून सुटका करताना उच्च न्यायालयाने हा निर्वाळा दिला. ही नोंद न केल्यास आयपीसी ३०६ हे कलम लावू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
महावितरणमध्ये सहायक अभियंते म्हणून काम करत असलेले किशोर शिंदे यांच्यावर कनिष्ठ तंत्रज्ञ दिलीप मगर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २० मार्च २०१४ रोजी दिलीप मगर आणि एस.बी. भामगर हे महावितरणाचे तंत्रज्ञ हडपसर येथील एक वायर नीट करण्यासाठी गेले. त्यासाठी भामगर इलेक्ट्रिक पोलवर चढले तेव्हा त्यांना विजेचा शॉक बसला. ४ एप्रिल रोजी भामगर यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे मगर यांना नैराश्य आले आणि या नैराश्यातूनच त्यांनी ८ एप्रिल २०१४ रोजी आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भामगर यांच्या मृत्यूमुळे ते खूप अस्वस्थ झाल्याचे लिहिले होते. तसेच शिंदे आणि आणखी दोन वरिष्ठ सारखे छळवणूक करत असल्याचा आरोपही मगर यांनी सुसाईड नोटद्वारे केला होता. त्यांच्या सुसाईड नोटची दखल घेत पोलिसांनी शिंदे आणि अन्य दोघांवर मगर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. हा खटला रद्द करण्यात यावा, यासाठी शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे होती.
‘भारतीय दंडसंहिता कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत
गुन्हा नोंदवायचा असल्यास आरोपीने पीडिताला आत्महत्या करण्यास चिथावणी दिल्याचा आरोप नोंदवणे आवश्यक आहे. आत्महत्या करण्यासाठी त्याने काहीतरी
मदत करणे किंवा काहीतरी बेकायदेशीर कृत्य केलेले असणे आवश्यक आहे,’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.
‘आरोपीमुळेच पीडित व्यक्तीने आत्महत्या केली, हे सिद्ध करणे आवश्यक आहे. पीडित व्यक्तीने आत्महत्या करणे, हाच आरोपीचा हेतू असणे आणि त्यादृष्टीने त्याने बेकायदेशीर कृत्य करणे, हे सिद्ध होणेही आवश्यक आहे,’ असे खंडपीठाने म्हटले.
या केसमध्ये मगरला त्याचा सहकारी मृत्यू पावल्याचा मानसिक धक्का बसला होता. शिंदेने
त्यांना आत्महत्या करण्यास चिथावणी दिल्याचा उल्लेख कुठेही
करण्यात आलेला नाही,’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. (प्रतिनिधी)