...तर ‘त्या’ दोघीही बचावल्या असत्या
By Admin | Updated: July 23, 2016 02:22 IST2016-07-23T02:22:33+5:302016-07-23T02:22:33+5:30
सासू आणि पत्नीमध्ये सुरू असलेला वाद विकोपाला जात कोणीतरी यातून टोकाचे पाऊल उचलेल, याचा अंदाज लक्ष्मीकांत कणगुटकर यांना आधीच झाला

...तर ‘त्या’ दोघीही बचावल्या असत्या
मनीषा म्हात्रे,
मुंबई- सासू आणि पत्नीमध्ये सुरू असलेला वाद विकोपाला जात कोणीतरी यातून टोकाचे पाऊल उचलेल, याचा अंदाज लक्ष्मीकांत कणगुटकर यांना आधीच झाला होता. याबाबत त्यांनी पोलिसांकडे पत्रव्यवहार केला. मात्र पोलिसांनी कौटुंबिक समस्या म्हणून याकडे दुर्लक्ष केले. जर याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आधीच समुपदेशन केले असते तर त्या दोघी बचावल्या असत्या.
शिवाजी पार्क येथील बाल गोविंद दास रोडवरील जय हनुमान को-आॅपरेटिव्ह सोसायटीत राहणारे लक्ष्मीकांत कणगुटकर यांचा २००० रोजी अक्षतासोबत विवाह झाला. कांदिवली येथील कॅप्सूल कंपनीत ते कामाला आहेत. वर्षभर त्यांचा संसार सुखाचा गेला. मात्र त्यानंतर वयोवृद्ध आई उषा आणि पत्नीमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. यामुळे दोघांमध्ये भांडणे होत. दोघी एकमेकांवर मारहाणीसाठी उतरत होत्या. दोघींचे भांडणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. याबाबत अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करीत पोलिसांनी त्यांना समज दिली.
मात्र या दोघींच्या वाढत्या भांडणातून कोणीतरी चुकीचे पाऊल उचलेले याची भीती लक्ष्मीकांतला होती. त्यामुळे त्याने याबाबत शिवाजी पार्क पोलिसांना लेखी अर्ज दिला होता. दोघींच्या भांडणातून काही तरी चुकीचे होऊ शकते, यामुळे तुम्ही यावर काही तरी मार्ग काढा, अशी विनंती त्याने यामध्ये केली होती. मात्र कौटुंबिक वाद म्हणून पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेर विकोपाला गेलेल्या याच वादातून लक्ष्मीकांतला या दोघींनाही गमवावे लागले. सध्या दोन मुलांची जबाबदारी त्याच्या एकट्यावर आहे. या घटनेने लक्ष्मीकांत खचले आहेत. पुढे काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
>फॅमिली मॅटरमध्ये समुपदेशन केले जाते
या प्रकरणात सासू- सुनेने तक्रारी केल्या होत्या. त्याबाबत एनसी दाखल करून त्यांना समजावण्यात आले होते. त्यात कुठलेही कौटुंबिक वादविवाद आल्यास त्यामध्ये समुपदेशन करण्यात येते. हे प्रकरण जुने असल्याने या प्रकरणात समुपदेशन झाले होते की नाही, याबाबत माहिती नाही.
- गंगाधर सोनावणे, वरिष्ठ निरीक्षक, शिवाजी पार्क पोलीस स्टेशन
>नात्यात निर्माण झालेल्या दुराव्याला दोषी कोण?
नवरा आईची बाजू घेऊन पत्नीला समजवू शकत नाही. आणि बायकोला समजावून ती ऐकत नाही. अशावेळी करणार काय, अशी परिस्थिती त्याच्यावर ओढवली होती. अशात त्याने मार्ग काढण्यासाठी पोलिसांची मदत घेतली, मात्र तीही उपयोगी न ठरल्याने याला दोषी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
>घटनेदरम्यान चिमुकला होता घरात...
गुरुवारी सकाळी सासू-सुनेचे भांडण सुरू असताना अक्षता यांचा लहान मुलगा राजदत्त (१४) घरातच होता. आतल्या खोलीत गाढ झोपेत असलेल्या राजदत्तला बाहेरच्या खोलीत सुरु असलेल्या भांडणाची चाहूल लागली नाही. जाग आल्यानंतर तो बाहेर आला तेव्हा बेडवर झोपलेल्या आईच्या तोंडातून फेस येत असल्याचे तर आजी खाली बेशुद्धावस्थेत पडल्याचे लक्षात आले. घाबरलेल्या या चिमुरड्याने थेट वडिलांशी संपर्क साधून माहिती दिली.