नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या छांगुर बाबा टोळीच्या सदस्याला जेरबंद करण्यासाठी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक (यूपी एटीएस) नागपुरात आले आणि येथे त्यांनी कसून चौकशी केली. मात्र संभाव्य ठिकाणी कथित साथीदाराच्या रूमला टाळे आढळल्याने आज हे पथक रिकाम्या हाताने परत गेल्याची माहिती पुढे आली आहे.
संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, छांगुर बाबाच्या टोळीतील अनेक सदस्य महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूरसह अन्य काही शहरात राहतात. हे प्रकरण तापल्यानंतर एटीएस कडून जागोजागी छापेमारी केली जात आहे. छांगुर बाबा टोळीतील एक आरोपी नागपुरात दडून असल्याची माहिती कळताच नोएड, मेरठ मधील काही जणांना घेऊन युपी एटीएसची दोन पथके दोन तीन दिवसांपूर्वी नागपुरात आली होती. इथे त्यांनी संभाव्य ठिकाणी धडक दिली. मात्र, संशयित साथीदाराच्या खोलीला कुलूप आढळल्यामुळे एटीएसच्या पथकाने त्याची नागपूर तसेच आजूबाजूच्या शहरात तपासणी केली.
एक पथक त्याच्या वास्तव्य असलेल्या रूमवरही विशेष नजर ठेवून होते. मात्र, संशयिताला कारवाईची कुणकुण लागल्यामुळे की काय तो येथून अंडरग्राउंड झाला. त्याने आपला मोबाईलही बंद केला. तीन दिवस होऊनही तो हाती लागला नसल्यामुळे एटीएसचे एक पथक आज परत गेल्याची खास सूत्रांची माहिती आहे.
पथके आली, तपासणीही झाली. मात्र...
विशेष म्हणजे एटीएसची पथके नागपुरात आली त्यांनी छांगुर बाबा टोळीशी संबंधित संशयिताची तपासणी केली, या वृत्ताला तपास यंत्रणेतील अनेक अधिकाऱ्यांनी 'ऑफ द रेकॉर्ड' दुजोरा दिला आहे. मात्र, या संबंधाने कोणतीही विस्तृत माहिती त्यांच्याकडून प्राप्त झाली नाही.