सातारा : पर्यावरणाचा समतल आणि वाळू टंचाईवर उपाय असणारा एम-सँड प्रकल्प शिरगाव (ता. कराड) येथील तरुण उद्योजक धैर्यशील पाटील यांनी सुरू केला आहे. राज्यातील हा पहिला प्रकल्प असल्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपक्रमाचे कौतुक केले आहे. दरम्यान, प्रकल्पाला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अधिकृत पत्र दिले आहे.नद्यांमधील वाळू उपशामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने २३ मे २०२५ रोजी ‘एम-सँड’ धोरण जाहीर केले होते. याच धोरणांतर्गत शिरगाव येथील गट नं. १७३ मधील क्षेत्र ०.४४.५० हे. आर.वर हा प्रकल्प आकारास येत आहे.युवा उद्योजक धैर्यशील पाटील यांनी या नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी पुढाकार घेतला असून, राज्यात सातारा जिल्हा एम-सँड निर्मितीत आघाडीवर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकल्पामुळे बांधकामासाठी दर्जेदार आणि पर्यावरणपूरक कृत्रिम वाळू उपलब्ध होणार असून, नदीपात्रातील वाळूवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
महसूल विभागाच्या एम-सँडचे धोरणाचा फायदा उद्योजकांनी घेतला पाहिजे. नवीन उद्योग यामुळे उभे राहतील आणि वाळूवरील अवलंबित्व संपेल. तसेच पर्यावरणाचेही रक्षण होईल. तसेच घरांची भक्कमता अधिक वाढणार आहे. - धैर्यशील पाटील, उद्योजक
पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन या दृष्टीने एम-सँड प्रकल्प महत्त्वाचे आहेत. प्रत्येक जिल्ह्यात किमान १०० प्रकल्पांना मान्यता देणार असून, वीज आणि रॉयल्टीमध्येही सवलत दिली आहे. जास्तीत जास्त तरुण उद्योजकांनी या उद्योगाकडे वळावे. - चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र