राज्यात, पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या मु्द्द्यावरून राज्यातील राजकारण तापले असतानाच, आज राज्य सरकारने हिंदी भाषेसंदर्भातील निर्णय मागे घेतला. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. यासंदर्भात, आता राज्य सरकारच्या वतीने डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्र लागू करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. यानंतर, शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया आली आहे. "आज हे आंदोलन केल्यानंतर, आता मराठी माणूस एकत्र होऊ नये, ५ तारखेला आम्ही जो मोर्चा ठरवला, तो मोर्चा होऊ नये, म्हणजे मराठी माणून एकत्र येऊ नये, म्हणून हा जीआर रद्द करण्यात आला," असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
ठाकरे म्हणाले, "आज संपूर्ण राज्यभरात हिंदी सक्तीच्या विरोधक आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारने काढलेल्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरलेली आहे. आपल्या राज्यातील सरकारने मराठी माणसाची एकजूट तोडण्याचा प्रयत्न केला. मराठी मते भाजपकडे खेचायची असा छुपा अजेंडा यामध्ये होता. पण समाधानाची गोष्ट म्हणजे, मराठी माणसाने जी एक समज्यस भूमिका घेतली की, आमचा भाषेला विरोध नाही, तर सक्तीला विरोध आहे. यामुळे इतर भाषिकांनाही कळले की, आपल्या भाषेविरुद्ध नाही, तर या राज्यातील मातृभाषेविरुद्ध जी सक्ती केली जाते, त्या सक्तीच्या विरोधात हे आंदोलन आहे. यामुळे ही फूट पडली नाही."
"या सरकारचा हाच प्रयत्न होता की, मराठी माणसांतील फूट आपल्याला लाभदायक ठरेल, असे त्यांना वाटले होते. म्हणून मराठी माणसांत फूट पाडायची. मराठी माणूस इतक्या मोठ्या प्रमाणात एकवटेल याची सरकारला कल्पना नव्हती. आज हे आंदोलन केल्यानंतर, आता मराठी माणूस एकत्र होऊ नये, कारण ५ तारखेला आम्ही जो मोर्चा ठरवला, तो मोर्चा होऊ नये, म्हणजे मराठी माणून एकत्र येऊ नये, म्हणून जीआर रद्द केला," उसे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजप म्हणजे अफवांची फॅक्टरी -ठाकरे पुढे म्हणाले, "मध्यंतरी एक पिक्चर आला होता, हरिश्चंद्राची फॅक्ट्री, तसा भाजप म्हणजे अफवांची फॅक्टरी झालाय. अफवा पसरायच्या, विरोधकांची बदनामी करायची आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणे हा भाजपचा धंदा झाला आहे. त्या धंद्याला आज मराठी माणसाने चोख उत्तर दिलं आहे. माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखाद संकट येईपर्यंत, आपण एकत्र होण्याची वाट कशाला बघायची. आपण नुसते एकवटलो आहोत. तर या संकटाला माघारी जावे लागले. म्हणून आता आलेली जाग आपल्याला कायम ठेवावी लागेल."
"सर्व मराठी माणसांना मी हात जोडून विनंती करतो की, आपण या सक्तीच्या विरोधात एकवटलो होतो. ती सक्ती मागे घेण्यात आली आहे. तरीही पाच तारखेला आपण मोर्चा काढायचा की सभा घ्यायची, कुठे घ्यायची, कधी घ्यायची, यासंदर्भातील कार्यक्रमासंदर्भात दोन दिवसांमध्ये सगळ्यांसोबत बोलून मी ठरवेल," असेही ठाकरे यावेळी म्हणाले.