अगतिक दत्ताभाऊंचे अश्रू
By Admin | Updated: June 11, 2014 01:39 IST2014-06-11T01:39:52+5:302014-06-11T01:39:52+5:30
दत्ता मेघे म्हटले तर विदर्भाचे साऱ्यांना जवळचे वाटावे, असे शेजारधर्म पाळणारे पुढारी. शेजारधर्म हा निव्वळ विश्वासावर उभा असतो. दत्ता मेघे हे एकेकाळी एलआयसीत काम करायचे. तोही विश्वासाचा धंदा होता.

अगतिक दत्ताभाऊंचे अश्रू
गजानन जानभोर
दत्ता मेघे म्हटले तर विदर्भाचे साऱ्यांना जवळचे वाटावे, असे शेजारधर्म पाळणारे पुढारी. शेजारधर्म हा निव्वळ विश्वासावर उभा असतो. दत्ता मेघे हे एकेकाळी एलआयसीत काम करायचे. तोही विश्वासाचा धंदा होता. तेथून पवारांनी विश्वास ठेवून त्यांना उचलले आणि मंत्री केले. शिक्षणसंस्था दिल्या, इंजिनियरिंग, मेडिकल कॉलेज दिले. हा सबंध काळ मेघेंच्या पवारांवरील निष्ठेचा नव्हे तर अंधश्रद्धेचा होता. ‘माझ्या कातड्याचे जोडे करून ते साहेबांच्या पायात घातले तरी माझ्यावरील त्यांचे उपकार फिटणार नाहीत’ ही कविता आरतीसारखे दरदिवशी डोळ्यात अश्रू आणून ते म्हणायचे. पण त्याचवेळी चिरंजीव सागर भाजपात गेले. मुलगा माझे ऐकत नाही, असे सत्यवचन त्यांनी त्यावेळी साऱ्या जगाला ऐकवले. पुढे पवारांनी पद दिले तेव्हा मुलाला भाजपाचा राजीनामा द्यायला लावून मेघेंनी पुन्हा एकवार पवारनिष्ठा दाखवली आणि हे पाय कधीच सोडणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतली.
पुढे त्यांनी पक्ष बदलला आणि विलासरावांचा हात धरून ते काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळी ‘मला माहेरी आल्यासारखे वाटते’असे पुन्हा डोळ्यात अश्रू आणून ते म्हणाले. प्राण गेला तरीही सोनियांची साथ आणि काँग्रेसचा हात सोडणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यावेळी त्यांनी घेतली. त्यामुळे पवारांच्या काँग्रेसशी नाही तर निदान सोनियांच्या काँग्रेसशी तरी ते एकनिष्ठ राहतील, असा विश्वास त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या भाबड्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला.
परवाच्या लोकसभेत मुलाचा पराभव झाल्यानंतर मेघे पुत्रांसह भाजपाच्या दारात उभे झाले आहेत. लवकरच नितीन गडकरी त्यांना भाजपवासी करून घेतील. आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असून लवकरच भाजपात प्रवेश करणार आहोत, असे सांगताना दत्ताभाऊंच्या डोळ्यात पुन्हा एकवार अश्रू उभे राहिले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा असा हा मेघेंचा अश्रुमय प्रवास आहे. मेघे हे दानशूर नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या दारावर गेलेला कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता रिकाम्या हाताने परत येत नाही. असंख्य गरीब मुलांना ते शिक्षणासाठी मदत करतात.
त्यांच्या शिक्षणसंस्थांमध्ये नोकरीसाठी डोनेशन घेतले जात नाही. त्यांच्याएवढे सामाजिक कार्य महाराष्ट्रातील कुठल्याही नेत्याने केलेले नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल साऱ्यांच्याच मनात आदर आहे. म्हणूनच आज मुलांच्या आमदारकीसाठी भाजपाच्या दारात झोळी घेऊन उभे असलेल्या दत्ताभाऊंची ही अगतिकता मनाला प्रचंड यातना देणारी आहे.
एखादा नेता एका राजकीय पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो, तेव्हा ते केवळ शारीरिक स्थलांतर नसते. तो मानसिक आणि वैचारिक स्थित्यंतराचा भाग असतो. आयुष्यभर जोपासलेल्या जीवनमूल्यांशी केलेली ती प्रतारणाही असते. गांधी-नेहरू अखेरपर्यंत एका विचाराशी घट्ट चिकटून राहिले. मेघे-गडकरींना जवळचे वाटेल असे उदाहरण द्यायचे झाल्यास ते संघाच्या कार्यकर्त्यांचे देता येईल. आमदारकी मिळते म्हणून संघाचा कार्यकर्ता कधी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये गेल्याचे ऐकिवात नाही. कारण तो वैचारिक निष्ठेचा भाग असतो. कुठल्याही विचाराशी कधी एकनिष्ठ नसलेले दत्ताभाऊ मुलांच्या राजकीय पुनर्वसनासाठी भाजपमध्ये जात असतील तर त्यांची अगतिकता एकवेळ समजून घेता येईल पण संघाच्या ‘एकनिष्ठ’ संस्कारात वाढलेल्या गडकरींनाही ते हवेहवेसे वाटतात, हा दुर्दैवाचा भाग आहे. भाजपशी, संघाशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलेल्या कार्यकर्त्यांसाठी मग गडकरींच्या मनात जागाच शिल्लक राहात नाही.
भाजपात जाण्याच्या दत्ताभाऊंच्या निर्णयाने कार्यकर्ते नाराज, मित्र दु:खी आणि चाहते अस्वस्थ आहेत. भाऊंना आता काय मिळवायचे राहिले? हा सर्वांच्याच मनातील प्रश्न आहे. ‘डोळे मिटण्याआधी पोरांना खासदार-आमदार झालेले पाहायचे आहे’ही त्यांची आंतरिक इच्छा आहे. त्यासाठीच ही धडपड सुरू आहे. एका बापाला तसे वाटणे स्वाभाविक आहे. पण आपल्या मुलांचं राजकीय पुनर्वसन करताना आपण दुसऱ्यांच्या मुलांचा हक्क मारत आहोत, ही जाणीव दत्ताभाऊंसारख्या सहृदय नेत्याला नसेल तर सार्वजनिक जीवनातील ती शोकांतिकाच म्हणावी लागेल.