राष्ट्रसंतांच्या साहित्यात समाजपरिवर्तनाची शक्ती, सुसंस्काराची ताकद; मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:44 IST2018-10-30T18:40:44+5:302018-10-30T18:44:18+5:30

राष्ट्रसंतांच्या विचारानेच राज्य सरकार मार्गक्रमण करीत असल्याचे भावपूर्ण प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.

Tashtrasant Tukdoji Maharaj gave strength to nation; Chief minister | राष्ट्रसंतांच्या साहित्यात समाजपरिवर्तनाची शक्ती, सुसंस्काराची ताकद; मुख्यमंत्री

राष्ट्रसंतांच्या साहित्यात समाजपरिवर्तनाची शक्ती, सुसंस्काराची ताकद; मुख्यमंत्री

ठळक मुद्देविकासासाठी ५८ कोटींचा निधीसुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य अलौकिक आहे. राज्यासह देशात मोठा समुदाय त्यांच्या विचारांवर चालतो. त्यांच्या साहित्यात समाजपरिवर्तनाची श

क्ती व विचारात समाजाला सुसंस्कारित करण्याचे बळ आहे. त्यागी व संतांना वंदन करण्याची देशाची परंपरा आहे. राष्ट्रसंतांच्या विचारानेच राज्य सरकार मार्गक्रमण करीत असल्याचे भावपूर्ण प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.
गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी समारंभाच्या समारोपीय कार्यक्रमात ग्रामगीता विचारपीठावरून ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, डॉ.एस. एन. सुब्बाराव, खा. आनंदराव अडसूळ, आ.डॉ. अनिल बोंडे, आ. रमेश बुंदिले, आ. मितेश भांगडिया, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, प्रकाश महाराज वाघ, पुष्पा बोंडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर गुरुदेवांचा अनुयायी म्हणून आपण आलो आहे. या पुण्यभूमीतून राष्ट्रसंतांच्या विचाराची ऊर्जा निश्चितपणे प्राप्त होते. महाराष्ट्राच्या संत परंपरेने इथल्या माणसांना केवळ भाविक, श्रद्धावान बनवले नाही, तर त्यांच्यात संकटाचा सामना करण्याची वृत्ती पेरली. राष्ट्रसंतांनी समाजात विजिगिषू वृत्ती, शौर्यवृत्तीचे बीजारोपण केले. त्यातून ऊर्जावान समाज तयार झाला. स्त्री पुरुष समतेचा पुरस्कार व जातिभेदाला विरोध त्यांनी प्रखरपणे केला. देशावर संकट आले तेव्हा स्वत: पुढे येऊन कार्य केले. राष्ट्रसंतांनी विश्वात्मक विचार मांडताना शेवटच्या माणसाचा विचार केला. आनंद हा पैशांनी विकत घेता येत नाही. मनाच्या व वागणुकीच्या श्रीमंतीची शिकवण त्यांनी दिली. त्यांच्या भजनात, शब्दांत समाज उभा करण्याची प्रेरणा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मोझरी विकास आराखड्यास ५८ कोटी रुपये निधी मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केला. प्रास्ताविक प्रकाश महाराज वाघ आभार जनार्दनपंत बोथे यांनी मानले.

स्वच्छता अभियानाची प्रेरणा ग्रामगीतेतूनच
राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून विश्वरूपी दर्शन दिले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची प्रेरणा ग्रामगीतेतून घेण्यात आली आहे. राष्ट्रसंतांनी ग्रामविकासाचा शाश्वत मंत्र ग्रामगीतेच्या माध्यमातून प्रत्येक राज्यकर्त्यांना दिला. स्वराज्याला सुराज्यात परिवर्तीत करायचे असतील, तर संस्कारित समाजच हे करू शकतो. तशी पिढी राष्ट्रसंतांनी घडवली. आमचे एक हजार गावांसाठीचे महाराष्ट्र सामाजिक ग्रामपरिवर्तन अभियान हीदेखील ग्रामगीतेचीच शिकवण आहे. या अभियानाच्या यशस्वितेसाठी प्रेरणा घ्यायला मी इथे आलो असल्याचे मुख्यमंत्रीे म्हणाले.

Web Title: Tashtrasant Tukdoji Maharaj gave strength to nation; Chief minister