सिरींजचा कचरा रस्त्यावर
By admin | Published: September 19, 2014 12:59 AM2014-09-19T00:59:35+5:302014-09-19T00:59:35+5:30
जैविक कचऱ्यातून आजाराचा संसर्ग पसरण्याचा तसेच त्यातील वस्तू पुन्हा वापरल्या जाण्याचा धोका सर्वात जास्त असतो. म्हणून शासकीय व खासगी इस्पितळांमधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट
दोन लाख रुग्ण वापरतात इन्सुलिनचे इंजेक्शन
सुमेध वाघमारे - नागपूर
जैविक कचऱ्यातून आजाराचा संसर्ग पसरण्याचा तसेच त्यातील वस्तू पुन्हा वापरल्या जाण्याचा धोका सर्वात जास्त असतो. म्हणून शासकीय व खासगी इस्पितळांमधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र घराघरांमधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याचे काय, याबाबत अद्यापही प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र आहे. शहरात सध्याच्या घडीला सुमारे दोन लाख रुग्ण इंजेक्शनमधून इन्सुलिन घेतात. यांचा दरदिवशीचा दीड लाखांच्यावर इंजेक्शन सिरींज कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. हा कचरा उचलणाऱ्यांचे आणि ते हाताळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जैविक घनकचरा आरोग्याला घातक ठरू शकतो. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावण्याचे नियम प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिले आहेत. शहरातील बहुसंख्य इस्पितळे याचे कठोरतेने पालनही करतात. रु ग्णालयातील खाटांप्रमाणे महापालिका जैविक कचऱ्यासाठी दर आकारते. याचे कंत्राट ‘सुपर हायजेनिक’ या एजन्सीला देण्यात आले आहे.
ही एजन्सी दवाखान्यांमधील जैविक, वैद्यकीय कचरा जमा करून त्याच्यावर प्रक्रि या करण्याचे काम करते. परंतु अनेक घरांमध्ये काही विविध कामानिमित्त वापरण्यात आलेले कॉटन, इंजेक्शनच्या सिरींज या थेट सामान्य कचऱ्यात टाकल्या जात आहे. यात इन्सुलिनचा वापर करणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वात अधिक आहे.
बदलती जीवनशैली आणि आहार यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
डॉक्टरांची जबाबदारी
डॉक्टर रुग्णांना इन्सुलिन घेण्यास सांगतात. त्यामुळे ही जबाबदारी डॉक्टरांची आहे. रुग्ण किती इन्सुलिन घेतो याची माहिती संबंधित डॉक्टरांकडेच असते. यामुळे डॉक्टरांनी ही खबरदारी घ्यायला हवी. सध्यातरी कचऱ्यातील इंजेक्शन टोचल्यामुळे कुठला कर्मचारी गंभीर झाल्याची घटना नाही.
-डॉ. मिलिंद गणवीर
उपसंचालक, आरोग्य विभाग मनपा.
कचऱ्यातील सिरींजमुळे आणखी धोका वाढतो
शहरात साधारण दोन लाख लोक इन्सुलिनचा वापर करतात. या रुग्णांना आपला जैविक कचरा स्वत:च हाताळावा लागतो. डॉक्टर हा कचरा आपल्याकडे जमा करण्याचा सूचना देत असले तरी अनेक रुग्णांना ते शक्य होत नाही. यामुळे घराघरांतून निघणाऱ्या कचऱ्यात हा कचरा जातो. परिणामी याचा धोका वाढतो. हेपेटायटिस बी, एचआयव्ही पुरताचा हा धोका राहत नाही तर यापेक्षाही गंभीर आजार होण्याची भीती असते.
-डॉ. सुरेश अग्रवाल