सत्तेसाठी शेतक-यांचा ‘स्वाभिमान’ गहाण!
By Admin | Updated: November 4, 2014 02:43 IST2014-11-04T02:43:53+5:302014-11-04T02:43:53+5:30
वर्षभरात खतासह शेतीस लागणा-या सर्वच घटकांचे दर वाढले असताना ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने गेल्यावर्षीपेक्षा तब्बल तीनशे रुपयांनी उचल कमी मागितली.

सत्तेसाठी शेतक-यांचा ‘स्वाभिमान’ गहाण!
राजाराम लोंढे, कोल्हापूर
वर्षभरात खतासह शेतीस लागणा-या सर्वच घटकांचे दर वाढले असताना ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने गेल्यावर्षीपेक्षा तब्बल तीनशे रुपयांनी उचल कमी मागितली. ‘स्वाभिमानी’च्या १३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच गेल्यावर्षीपेक्षा उचल कमी मागून संघटनेने शेतकऱ्यांचे की सरकारचे हित पाहिले याविषयी उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
गेल्यावर्षी संघटनेने तीन हजारांची मागणी करत २६५० रुपयांवर तडजोड केली. गेल्यावर्षी एवढाच यंदा साखरेचा दर आहे, पण शेतीशी निगडित सर्व बाबींचे दर वाढल्याने यंदा किमान ३५०० रुपयांची मागणी होऊन किमान २८०० रुपयांपर्यंत राजू शेट्टी तडजोड करतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. पण २७०० रुपयांची मागणी करून शेट्टी यांनी शेतकऱ्यांना धक्काच दिला.
साखरेचे मूल्यांकन प्रतिक्विंटल २६३० रुपये राज्य बँकेने जाहीर केले आहे. त्यातून कारखानदारांच्या हातात शेतकऱ्यांना देण्यासाठी सरासरी १८०० रुपये उपलब्ध होऊ शकतात. हे गृहीत धरून मागणी केली म्हटले तरी गेल्यावर्षीपेक्षा ५० रुपये उचल कमी आहे तरीही ३ हजारांची मागणी करणे अपेक्षित होते. केंद्रात व राज्यात बदलेले सरकार व त्यामध्ये ‘स्वाभिमानी’चा सहभागामुळे शेट्टींचे गणित चुकल्याचे बोलले जात आहे. त्यात संघटनेत पडलेली फुटीमुळे रस्त्यावरील आंदोलन यशस्वी होईल का, याविषयीही संघटनेच्या नेत्यांना साशंकता असल्यानेच तब्बल २५ दिवसांची डेडलाईन देऊन रस्त्यावरील संघर्ष टाळण्याचा प्रयत्न शेट्टी यांनी केला आहे. या संघटनेला आता रस्त्यावरची लढाई झेपणार नसल्यानेच त्या संघर्षापेक्षा कायद्यावरच बोट
ठेवून कारखानदारांची कोंडी
करण्याचा प्रयत्न केला, पण यात संघटनेचीच कोंडी होणार हे निश्चित आहे.
सरकारमध्ये ‘स्वाभिमानी’ सहभागी असली तरी त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे संघटना भाजपावर जास्त दबाव टाकू शकत नाही. त्यात शेट्टी आपल्यासह सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद घेणार आहेत. राजकीय तडजोडीमुळे चळवळीच्या उद्देशाला कुठे तरी धक्का लागल्याची भावना शेतकऱ्यांमधून बोलली जात आहे. कारखानदारांना एफआरपी द्यायची म्हटली तर दोन टप्प्यातच देता येऊ शकते. संघटनेने कायद्याचा आधार घेऊन गुन्हे दाखल करण्यास सुरू केले तर साखर कारखानदार अडचणीत येणार म्हणूनच शेतकरी संघटनेने कारखाने सुरू करण्यास सांगूनही कारखानदार अजून गप्पच दिसत आहेत.
संघटनेने १५ किलोमीटरचे हवाई अंतरानुसार वाहतूक घेण्यास सांगितले आहे. हे खासगी कारखान्यांसाठी ठीक आहे, पण सहकारी कारखान्यांचे कार्यक्षेत्र ५० किलोमीटरपर्यंत येते. मग त्या बाहेरील सभासदांचे काय करायचे? शेतकऱ्यांनी कारखान्यांच्या गेटवर ऊस पोहोचवला तरच एफआरपी एकरकमी देण्याचे बंधन कारखानदारांवर आहे. पण सहकारात कायदा आणि सहकार्याचा समन्वय साधावा लागत असल्याची
भावना कारखानदारांमधून व्यक्त होत आहेत.