नोव्हेंबरअखेरपासूनच ऐकू येणार विवाहेच्छूंचा अंगणात सनईचे सूर!
By admin | Published: November 20, 2014 10:01 PM2014-11-20T22:01:11+5:302014-11-21T00:28:05+5:30
यंदा कर्तव्य उशिराच : पुढील वर्षात नियोजित वधू-वरांसाठी मोठ्या तारखा
सातारा : लग्न ठरवून बसलेले अनेक नियोजित वधू-वर गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहे. मात्र, तुळशीच्या लग्नाला पंधरा दिवस होऊ गेले तरी लग्नाचा लाडू काही खायला मिळाला नाही. यंदा तारखाच कमी असल्याने नोव्हेंबरअखेरपासूनच लग्नाचे बार उडण्यास सुरुवात होणार आहे.
आपणाकडे विनोदाने म्हटले जाते की, ‘शादी का लड्डू जो खाए ओ पछताए और जो ना खाए ओ भी पछताए,’ हे अगदी खरं आहे. अनेकांची लग्नं सहा-सात महिन्यांपूर्वीच ठरली आहेत. शक्यता दरवर्षी दिवाळी झाली की लग्नाच्या तिथी सुरू होतात; पण यंदा याला काहीसा उशीर झाला आहे. लग्नाच्या तिथी नोव्हेंबरअखेर पासूनच सुरू होत आहेत. त्यामुळे नियोजित वधू-वरांसाठी कधी हा काळ जातोय, अशी अवस्था झाली आहे.
नियोजित वधू-वरांसाठी हा काळ प्रतीक्षेचा असला तरी लग्नघरातील वडीलधाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. कारण, त्यांना लग्नाची तयारी करण्यासाठी मोठा कालावधी मिळाला आहे.
लग्न पत्रिकाही छापून आल्या आहेत. त्या मित्रमंडळी, पै-पाहुण्यांना देण्यात ते दंग आहेत. तुळशीच्या लग्नानंतर लग्न काढल्यास शाळा-महाविद्यालयांना सुटी असते. त्यामुळे मोठ्या संख्येने पाहुणे येत असतात; मात्र शाळा सुरू झाल्यामुले पाहुण्यांच्या येण्यावर मर्यादा येणार आहेत.
यंदा २६ नोव्हेंबरपासून लग्नाच्या तिथी सुरू होत आहेत. नोव्हेंबरमध्ये केवळ दोन तिथी असून, डिसेंबरमध्ये चक्क बारा तारखा आहेत. यामध्ये १, ३, ६, ७, १२, १५, १६, १७, १८, २४, २८, ३० या तारखा लग्नासाठी शुभ मानल्या जात आहेत.
२०१५ या वर्षात १२ जूनपर्यंत ५९ लग्नतिथी आहेत. यामध्ये जानेवारीत २४, २५, २६, २९, फेबु्रवारी ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १५, २१, २२, २३, २७. मार्च ४, ७, ९, १०, १२, १७.
एप्रिलमध्ये २१, २७, २८, ३०. मे २, ५, ६, ७, ८, ९, ११, १४, १५, २७, २८, ३०. जून २, ४, ६, ७, ११ व १२. (प्रतिनिधी)
माझे लग्न ठरून सात महिने झाले आहेत. इतके दिवस काही वाटले नाही, मोबाईलवरून आम्ही नेहमी बोलत असतो; पण कधी एक तारीख येईल, असे झाले आहे. आम्ही एक-एक दिवस मोजत आहोत.
- शीतल गारे, नियोजित वधू
लग्न म्हटले की, रुखवत हा बनवायलाच हवा. लग्नात मुलीकडून काय रुखवत मिळाला आहे, हे पाहण्यासाठी गृहिणींची चढाओढ असते. काही ठिकाणी चक्क विविध नातेवाईकांच्या लग्नात दिलेल्या रुखवताशी तुलना केली जाते. योगायोगाने यंदा लग्नसराईला उशिर झाला आहे. त्यामुळे वधूपक्षाला चांगलात चांगला रुखवत बनविण्यास जादा वेळ मिळाला आहे.
वाजंत्री, घोडेवाल्यांचेही नियोजन
तारखा उशिरा असल्या तरी वाजंत्रीवाल्यांची तयारी जोरात सुरू आहे. नवनवीन गाणे वाजविण्याची ते रात्रंदिवस तयारी करत आहेत. तर घोडेवालेही घोड्यांना त्यावर नृत्य शिकविणे, सराव करून घेत आहेत.
उशिरा लग्न तिथी असल्याने एकाच तारखेला जास्त लग्न असल्याने या मंडळींनी दोन, तीन ठिकाणाच्या सुपाऱ्या घेतल्या आहेत.