साखर संकुलावरील हल्ला अयोग्य - शरद पवार
By Admin | Updated: January 15, 2015 17:18 IST2015-01-15T15:38:44+5:302015-01-15T17:18:51+5:30
ऊस उत्पादकांच्या पैशातून उभे राहिलेल्या साखर संकुलावर झालेला हल्ला ही अतिशय दुर्दैवी व अयोग्य घटना असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

साखर संकुलावरील हल्ला अयोग्य - शरद पवार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - ऊस उत्पादकांच्या पैशातून उभे राहिलेल्या साखर संकुलावर झालेला हल्ला ही अतिशय दुर्दैवी व अयोग्य घटना असल्याचे मत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर टीका केली. सत्तेत असूनही सरकारी मालमत्तेवर हल्ला केला जातो हे योग्य नसून ऊस दराचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा असे आवाहान केंद्र व राज्य सरकारला केले.
ऊसाला रास्त भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पुण्यातील साखर संकुलात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी ऊसाला रास्त भाव मिळावा यासाठी आंदोलनाचा मार्ग निवडला होता. त्याच पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
ऊस उत्पादक पट्ट्यात सध्या चिंतेचे वातावरण आहे. एकीकडे उसाचे वजन वाढलेले असतानाच त्याच्या किमती जागतिक बाजारात पडलेल्या आहेत. त्यातच साखर निर्यात करणा-यांसाठी दिले जाणारे अनुदानही बंद करण्यात आल्याने साखर कारखानदारांनी साखरेची निर्यातही बंद केली असल्याचे ते म्हणाले. साखर निर्यातीला अनुदान सुरू करावे अशी मागणीही त्यांनी केली.