Sudhakar Badgujar News: नाशिकमध्ये ठाकरे गटात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी संघटनात्मक बदलावरून पक्षात १० ते १२ जणांची नाराजी असल्याचे जाहीरपणे कबूल केले होते. यानंतर सुधाकर बडगुजर यांची थेट उद्धव ठाकरेंच्याशिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. संजय राऊतांनी फोन केला आणि सुधाकर बडगुजर यांना काढून टाकण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. या संपूर्ण घडामोडींनंतर सुधाकर बडगुजर यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले
नाशिकमध्ये ठाकरे गटात सुरू असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या काही नेते, पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याने सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्याचे याच पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. यानंतर काही मीडियाशी बोलताना सुधाकर बडगुजर यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
मी योग्य वेळी माझी प्रतिक्रिया देईन
पक्षाने कोणाची हकलपट्टी करायची कोणाला पक्षात ठेवायचे, हा पक्षाचा निर्णय आहे. त्यावर मी सध्या काहीही बोलू इच्छित नाही. मी योग्य वेळी माझी प्रतिक्रिया देईन. माझी पुढची भूमिका काय असेल हे मी वेळ आल्यावर सांगेन. पक्षातून हकालपट्टी होईल, अशी कोणतीही कुणकुण लागलेली नव्हती. नाराजी व्यक्त करणे हा गुन्हा असेल तर ते योग्य नाही. पक्षप्रमुखांनी संधी दिली असती तर भेटलो असतो. पण आता हकलपट्टी झाली आहे तर पक्षप्रमुखांचे भेट घेण्याचा प्रश्न नाही. अचानक निर्णय झाला, पक्षाचा निर्णय होता, पक्षाने घेतला, असे सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.
दरम्यान, पक्षामध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करणे गुन्हा असेल आणि त्या गुन्ह्याच्या शिक्षेचे हकालपट्टीमध्ये रुपांतर होत असेल तर त्याचे उत्तर मी काय देणार? मी पक्षाविरुद्ध कोणतही वक्तव्य केले नाही. असे कोणतेही वक्तव्य मी केले असेल तर ते पुढे आणावे, असे आव्हान देतानाच, संघटनात्मक बदल झाले तेव्हा नाराजी व्यक्त केली, काल उघडपणे बोलून दाखवले, तो जर गुन्हा असेल तर तो मी केला. त्याची शिक्षा जर हकालपट्टी असेल तर ती मला मान्य आहे, असा पुनरुच्चार बडगुजर यांनी केला. हकालपट्टीनंतर आता उद्धव ठाकरे कोणता संवाद साधणार? न्यायलयातही एकतर्फी निर्णय होत नसतो, दोन्ही बाजू ऐकल्यानंतर निर्णय दिला जातो, या शब्दांत सुधाकर बडगुजर यांनी या कारवाईविरोधात खंत व्यक्त केली.