लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग) १८ ते १९ ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकणातील सर्वच जिल्हे; नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, सोलापूर, धाराशिव आणि लातूर येथे जोरदार पाऊस होईल. खान्देश व मराठवाड्यातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
या भागात रेड अलर्ट
पुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला असून पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यात तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.