शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

एसटीचे भाडे वाढले; पण सुट्या पैशांवरून सावळा गोंधळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 06:53 IST

‘भाडेवाढ पाच रुपयांच्या पटीत असावी’ असा प्रस्ताव एसटीने पाठवला होता. प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी एक रुपयाच्या पटीत भाडेवाढीचे आदेश काढले!

श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस

एसटीच्या बहुचर्चित भाडेवाढीला राज्य परिवहन प्राधिकरणाकडून अखेर हिरवा कंदील मिळाला; पण या भाडेवाढीतून  अनेक मुद्दे समोर आले असून, प्रवासी जनता व एसटीचे वाहक यांच्यात सुट्या पैशांवरून वादावादी सुरू झाली आहे. ही भाडेवाढ वादाच्या  व संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून,  राजकीय नेते व अनेक मंत्र्यांनी केलेल्या वेगवेगळ्या विधानांमुळे संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

नवीन भाडेवाढ ही पाच रुपयांच्या पटीत असावी, असा स्पष्ट प्रस्ताव एसटीने पाठवला होता. १६ जून २०१८  व २६ ऑक्टोबर २०२१ ला तशाच प्रकारे भाडेवाढ केल्याचे तोंडी सांगूनही  प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी पाच रुपयांच्या पटीत आर्थिक नुकसान होण्याची भीती दाखवून अनपेक्षितपणे बदल करून  एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ  करण्यात यावी, असा आदेश प्रसारित केला. परिणामी गेले तीन दिवस सुट्या पैशांवरून वाद होऊन प्रवासी आणि एसटीचे वाहक यांच्यात खटके उडत आहे. यातून सर्वांनाच मानसिक त्रास होताना दिसतो आहे. निव्वळ राज्य परिवहन प्राधिकरणातील अधिकारीच जबाबदार आहेत. एसटीच्या भाडेवाढ प्रस्तावाला २५ जानेवारी रोजी  राज्य परिवहन प्राधिकरणाकडून मंजुरी देण्यात आली; पण मूळ प्रस्तावात भाडेवाढ पाच रुपयांच्या पटीत असावी असेच एसटीने स्पष्ट नमूद केले असताना एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. 

भाडेवाढ निर्णयाची  माहिती अधिकाऱ्यांनी दिली नसल्याचे परिवहनमंत्र्यांनी केलेले विधान चुकीचे आहे.  भाडेवाढीसंदर्भात आदल्या दिवशी परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान भाडेवाढीची संपूर्ण माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना दिली होती, अशी आमची माहिती आहे.  भाडेवाढ आणि त्यातून निर्माण झालेल्या सुट्या पैशांच्या देवाण-घेवाणीवरून एसटीचे वाहक  व प्रवासी यांच्यात वादावादी सुरू झाल्यावर सर्व स्तरांतून रोष निर्माण करणाऱ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळेच आता परिवहनमंत्र्यांनी हात झटकले असल्याचे दिसते. 

भाडेवाढीसारखे जनतेच्या संबंधातील विषय मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्यात येऊन निर्णयासाठी मंत्रिमंडळाची मान्यता असावी लागते. किंबहुना असे निर्णय घेताना  मुख्यमंत्र्यांना त्याची कल्पना द्यावी लागते, असे संकेत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. त्यांना अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आला, असे स्पष्ट दिसते. हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेसाठी  आलाच नसल्याचे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.

मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ६८(२) तरतुदीनुसार भाडेवाढ करण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत. मात्र गेले सुमारे २५ महिने प्राधिकरणाची बैठकच झाली नव्हती. वास्तविक पाहता वर्षातून दोन बैठका झाल्या पाहिजेत असा उल्लेख कायद्यामध्ये आहे. गेली चार वर्षे भाडेवाढ करण्यात आलेली नाही. खरे तर त्या त्या वेळी थोडी भाडेवाढ केली तर त्याचा एकदम फटका प्रवाशांना बसत नाही. एसटीतर्फे दरमहा विविध प्रकारचे ३६० कोटी रुपयांचे सवलतमूल्य प्रवाशांना दिले जाते, पण एसटीला सरकारतर्फे केवळ ३०० कोटी रुपये परतावामूल्य दिले जाते. 

एसटीचा तोटा वाढत चालल्याने १४.९५ टक्के इतकी सरासरी भाडेवाढ करावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून देण्यात आला होता. भाडेवाढीचे सूत्र कसे असावे हेसुद्धा मूळ प्रस्तावात स्पष्ट नमूद करण्यात आले असून मूळ प्रस्तावाला प्राधिकरणाने पुन्हा एकदा बैठक घेऊन मंजुरी दिल्यास हा प्रश्न चुटकीसरशी  निकाली निघेल. यासंदर्भात गेले तीन दिवस सुरू असलेल्या चर्चा, नेतेमंडळींची वादग्रस्त वक्तव्ये, प्रवासी व एसटीचे वाहक यांच्यात सुट्या पैशांवरून झालेली वादावादी,  प्रसारमाध्यमांमध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया पाहता हा विषय तातडीने मार्गी लावण्याचा झालेला आहे, हे नक्की!

टॅग्स :state transportएसटीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार