महापुरामध्ये एसटीचेही कोट्यवधींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 12:45 AM2019-08-16T00:45:38+5:302019-08-16T00:46:00+5:30

निसर्गही किती विचित्र आहे, एका बाजूला मराठवाड्यात सुका दुष्काळ पडला असतानाच कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक व कोकणाला निर्दयीपणाने पावसाने झोडपून काढले.

ST also suffered billions of losses in Flood | महापुरामध्ये एसटीचेही कोट्यवधींचे नुकसान

महापुरामध्ये एसटीचेही कोट्यवधींचे नुकसान

googlenewsNext

- रत्नपाल जाधव

निसर्गही किती विचित्र आहे, एका बाजूला मराठवाड्यात सुका दुष्काळ पडला असतानाच कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक व कोकणाला निर्दयीपणाने पावसाने झोडपून काढले. इतके की, अनेक वर्षांनी महापूर आला. भयावह पूरसदृश परिस्थिती महाराष्ट्रात १ आॅगस्टपासून निर्माण व्हायला सुरुवात झाली, पण इतकी भयानक परिस्थिती निर्माण होईल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. शहरांना जोडणारे अनेक महामार्ग तसेच गावाकडे जाणारे छोटेछोटे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले, त्यामुळे दररोज या रस्त्यावर धावणारी लोकवाहिनीही ठप्प झाली. किमान १० लाख किमी इतक्या बससेवा रद्द झाल्या. या पूरस्थितीचा थेट फटका एसटीलाही बसला. तो थोडाथोडका नसून या महापुरामुळे एसटीचे तब्बल १०० कोटींचे नुकसान झालेले आहे.

एसटी आगारातून बाहेरच पडू शकल्या नाहीत. त्यामुळे दररोज एसटीचा चार ते पाच कोटी महसूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. बसस्थानकेच पुराच्या पाण्यात अडकल्याने स्थावर मालमत्तेचेही खूप नुकसान झाले. १०० कोटी हा अंदाजे आकडा आहे, त्याहीपेक्षा अधिक नुकसान या महापुरामुळे झालेले असू शकते. कोल्हापूर विभागात १ ते ९ आॅगस्टदरम्यान सुमारे २९ हजार ५१७ बसफेऱ्या रद्द झाल्या. विभागात १२ आगार पूर्णपणे पाण्यात होते. एकट्या कोल्हापुरात सुमारे तीन कोटी ३० लाख, तर सांगली विभागात आठ हजार फेºया रद्द झाल्याने सव्वाचार कोटी रुपयांचा महसूल बुडाला. सातारा, पुणे, सोलापूर येथेही जवळपास पाच ते सहा हजार फेºया रद्द झाल्याने तेथीलही नुकसान कोटींच्या घरात आहे. तळकोकणातही तीच परिस्थिती होती. ५ आॅगस्टपासून तर एकही गाडी या पूरग्रस्त भागात रस्त्यावर जाऊ शकली नाही. दिसेलच कशी, गोरगरिबांची नेहमी नेआण करणारी एसटीच पुराच्या पाण्यात अडकलेली होती.

किल्लारीला भूकंप झाला, तेव्हाही सर्वप्रथम मदतीला धावली ती एसटी. पुण्याच्या माळीण गावात अख्खं गाव डोंगराने गिळंकृत केलं. ही बातमी केवळ एसटीमुळे समजू शकली. पण, आज तीच अडकलेली होती, नाही तर एसटीच बचावकार्यात सर्वांच्या पुढे दिसली असती.
दुसरीकडे मुंबई-पुणे मार्गावर एसटीच प्रवाशांना मदतीला सरसावल्याचे चित्र आहे. कर्जत-लोणावळा महामार्गावर दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वेसेवा ठप्प होती. प्रवासी जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून एसटीने शिवनेरीच्या दररोजच्या फेऱ्यांव्यतिरिक्त ३२ फेºया दोन्ही बाजूने जादा वाढवून प्रवाशांना दिलासा देण्याचे काम केले आहे. तळकोकणातही पुराचा फटका खूपच बसला असून एसटी पुराच्या पाण्यात अडकल्याचे चित्र अनेक ठिकाणी आपणास पाहायला मिळाले. परंतु, कोकणातील महापुराकडे सरकारने व माध्यामांनीही कानाडोळा केल्याचा आरोप कोकणवासीयांनी केलेला आहे. महापुरामुळे कोकणातही खूप भयंकर परिस्थिती होती. अनेक घरे पाण्यात गेलेली होती. रस्ते खचलेले असल्याने वाहतूकही ठप्प झालेली होती.

महापुरात एसटीचं झालेलं १०० कोटींचं नुकसान ही काही छोटी गोष्ट नाही. पण, निसर्गापुढे माणूस किती हतबल असतो, हेच यानिमित्ताने अधोरेखित होते. ही परिस्थिती लक्षात घेता यापुढे अनेक खबरदारीचे उपाय करावे लागणार आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई, ठाणे परिसरात तुफान पाऊस झाला. कल्याण, अंबरनाथ, टिटवाळा, बदलापुरात सर्वच ठिकाणी सोसायट्या, चाळी, गावपाड्यांना पाण्याचा वेढा पडला होता. हे सर्व २००५ ला २६ जुलैच्या पुरापेक्षाही भयानक होते. बदलापूर-वांगणी परिसरात अडकलेल्या ट्रेनची दृश्ये आजही थरकाप उडवतात. आता यापुढे अशा गोष्टी घडू शकतात, याची खूणगाठ बांधूनच प्रत्येकाने व सरकारी यंत्रणांनीही अगोदरच सज्ज राहायला हवे, हे मात्र निश्चितच. एसटीने अशी अनेक संकटं अनुभवली आहेत. या आर्थिक फटक्यातूनही कर्मचारी परत एकदा एसटीला उभं करतील, यात कोणतंही दुमत नाही.

महाराष्ट्रापुढे मुख्य प्रश्न आहे, तो त्या असंख्य गावांचा, उद्ध्वस्त झालेल्या संसारांचा, त्यांना पुन्हा उभं करण्याचा... देशावर कोणतंही संकट आलं तरी आपला महाराष्ट्र नेहमीच मदतीसाठी पुढे असतो. पण, आज महाराष्ट्राला गरज आहे, मदतीची. ठाणे, मुंबईतून, राज्यातील ठिकठिकाणांहून अनेक हात मदतीसाठी सरसावलेले दिसत असून जातीपातीच्या भिंती पार गळून पडल्या आहेत.
 
कोल्हापूर, सांगलीमध्ये आलेल्या महापुरात उद्ध्वस्त झालेले संसार, पाण्यात बुडालेली गावं, रस्ते आपण पाहिले. या महापुराची झळ एसटीलाही बसली. त्या ८ ते ९ दिवसात किमान १० लाख किमी इतक्या बससेवा रद्द झाल्या आणि एसटीचे सुमारे १०० कोटींचे नुकसान झाले. एकट्या कोल्हापूर विभागात १२ आगार पूर्णपणे पाण्यात होती. तिथे सुमारे तीन कोटी तीस लाखाचा तर सांगली जिल्ह्याचा सव्वाचार कोटी रूपयांचा महसूल बुडाला. त्याचबरोबर तळकोकणातही पावसाचा एसटीला फटका बसला. परंतु पाणी ओसरू लागल्यावर ही लोकवाहिनी पुन्हा धावू लागली आहे. एसटीने अशी अनेक संकटे अनुभवली असल्याने या आर्थिक फटक्यातूनही एसटीला पुन्हा उभं करू, असा विश्वास आणि जिद्द कर्मचा-यांमध्ये आहे.

एसटी आणि तिचे कर्मचारी कुठे कमी पडत नाहीत. सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकण येथे आमच्या एसटी कर्मचाºयांची कुटुंबंही राहतात. त्यांनाही या पूरपरिस्थितीची झळ पोहोचलेली आहे.महापुराचा फटका एसटीलाही बसलेला असला तरी माझ्या एका वाहक मित्राने लगेच स्वत: प्रशासनास अर्ज देऊन एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांना देण्यासाठी विनंती केली. हे एक प्रातिनिधिक उदाहरण झालं, असे कितीतरी एसटी कर्मचारी आपल्या परीने मदत करत असतात.

Web Title: ST also suffered billions of losses in Flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.