पुत्राचे वक्तव्य राणेंना अडचणीत आणणारे
By Admin | Updated: August 18, 2014 03:41 IST2014-08-18T03:41:33+5:302014-08-18T03:41:33+5:30
काँग्रेस नेते नारायण राणे हे त्यांच्या मुलांमुळे अनेक वेळा राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत

पुत्राचे वक्तव्य राणेंना अडचणीत आणणारे
मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे हे त्यांच्या मुलांमुळे अनेक वेळा राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. नीलेश राणेंनी शनिवारी राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांच्याविरुद्ध अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्याने काँग्रेस आणि आघाडीच्या राजकारणात नारायण राणे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांना पराभव पत्करावा लागला. याशिवाय कोकणातील त्यांच्या साम्राज्याला शिवसेनेने खिंडार पाडायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते दीपक केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशामागे शिवसेनेची हीच रणनीती आहे़ या सर्व घडामोडीमुळेच राणे आधीच अडचणीत आहेत.
नारायण राणे यांच्या दोन्ही पुत्रांनी त्यांना वेळोवेळी अडचणीत आणल्याचे पाहावयास मिळाले आहे़ यापूर्वी जयवंत परब काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या कार्यालयावर स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी केलेल्या हल्ल्यामुळे तसेच त्यानंतर चिंटू शेख गोळीबार प्रकरणात राणे अडचणीत आले होते. तर नितेश यांनीच गोव्यात टोलनाक्यावर केलेल्या मारहाणीचे प्रकरणही गाजले होते.
नीलेश राणे यांनीसुद्धा यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा प्रचारादरम्यान नारायण राणेंच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली होती. या सर्व प्रकारामुळेच रवींद्र फाटक, जयवंत परब, श्रीकांत सरमळकर, विजय वडेट्टीवार असे सर्व समर्थक राणेंना सोडून गेले. काहींनी पुन्हा शिवसेनाप्रवेश केला तर काहींनी राणे गट सोडला. एकूणच दोन्ही मुलांच्या वक्तव्य आणि वर्तणुकीमुळे राणे वारंवार अडचणीत येत असून, त्यामुळेच येती निवडणूक राणेंना कठीण जाईल, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.