...तर आम्हीही जाळपोळ करू!
By Admin | Updated: June 27, 2016 05:52 IST2016-06-27T05:08:46+5:302016-06-27T05:52:48+5:30
लोकशाहीत प्रत्येकाला लिखाणाचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे.

...तर आम्हीही जाळपोळ करू!
मुंबई : लोकशाहीत प्रत्येकाला लिखाणाचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमच्या नेत्यांचे पुतळे जाळून जे आंदोलन करत आहेत त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, अशा शब्दांत भाजपाने रविवारी शिवसेनेच्या आंदोलनांचा समाचार घेतला. शिवसेना-भाजपा या सत्ताधारी पक्षात गेल्या काही दिवसांपासून वादाचे कवित्व अजून संपलेले नाही. सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. सतत आमच्या विरोधात लिहिणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्यांनी आम्हालाही तशीच आंदोलने करणाच्या अधिकार आहे, हे लक्षात ठेवावे. त्यामुळे यापुढे तशीच प्रतिक्रिया भाजपातून उमटली तर सहन करण्याची तयारी ठेवावी, असा इशारा मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला. आतापर्यंत एकमेकांवर बोचरी टीका करणाऱ्या भाजपा-शिवसेनेत जाळपोळीच्या निमित्ताने संघर्षाचा नवा अंक सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई भाजपाच्या वतीने रविवारी ‘मन की बात, चाय के साथ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेना आणि त्याच्या मुखपत्राचे नाव न घेता शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपा नेत्यांवरील बोचरी टीका होत असते. त्यामुळे भाजपानेही अलीकडेच आपल्या ‘मनोगत’ या पाक्षिकातून शिवसेनेवर हल्लाबोल केला.
भाजपा प्रवक्ता माधव भांडारी यांनी आपल्या एका लेखात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना शोले चित्रपटातील ‘असरानी’ यांच्याशी केली. यावर चिडलेल्या शिवसैनिकांनी माधव भांडारी यांचे पुतळे जाळले आणि ‘मनोगत’ची होळी केली. शिवसेनेच्या या जाळपोळीला जाळपोळीने उत्तर देण्याची भूमिका भाजपाने घेतली. (प्रतिनिधी)
>फडतूस धमक्या
कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्याकडेच गृहखात्याचा कारभार आहे. त्यामुळे उघडउघड जाळपोळीची धमकी देणाऱ्या आशिष शेलारांवर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कारवाई करावी. त्यांच्या फडतूस धमक्यांना शिवसेना भीक घालत नाही, असा टोला शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी हाणला.