लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: गणेशभक्तांनी दिलेले दान सत्पात्री लागावे यासाठी काही मंडळे विविध सामाजिक उपक्रम राबवितात. परभणीतील श्री वक्रतुंड गणेश मंडळानेएका मध्यमवर्गीय कुटुंबातील जोडप्याचा विवाह लावून देण्याचा आगळावेगळा विधायक उपक्रम केला आणि भक्तांनी दिलेल्या वर्गणीरूपी दानाचे सत्कर्मात रूपांतर केले. गणेश मंडपातच विवाह उरकल्यानंतर ढोल-ताशाच्या गजरात नवदाम्पत्याची जंगी वरातही काढण्यात आली. त्यांना संसारिक वस्तू भेट देण्यात आल्या आणि जंगी वरात काढण्यात आली.
विघ्नहर्ता साक्षीला
मंडळाने पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. यंदा या मंडळाचे १९ वे वर्ष आहे. आगळावेगळा सामाजिक उपक्रम म्हणून मंडळाने अनावश्यक खर्चाला फाटा देत स्वखर्चातून एका जोडप्याचा विवाह सोहळा आयोजित केला होता. गंगाखेड तालुक्यातील रूमणा जवळा येथील वैष्णवी लक्ष्मणराव कदम आणि बीड जिल्ह्यातील धानोरा रोड येथील शुभम संभाजी पवार यांचा शुभमंगल सोहळा शुक्रवारी पार पडला. गणेशमूर्ती स्थापन झालेल्या परिसरात मंडपात विधिवत पद्धतीने विवाह लावण्यात आला.