...अन ‘श्रीमंत’ योगी झाले

By Admin | Updated: August 20, 2015 10:09 IST2015-08-20T01:35:46+5:302015-08-20T10:09:33+5:30

हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतरही ‘श्रीमान योगी’ राहिलेल्या शिवरायांचा इतिहास महाराष्ट्रातील आबालवृद्धांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचविणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या अनोख्या दातृत्वाने

... An 'Shrimant' became a yogi | ...अन ‘श्रीमंत’ योगी झाले

...अन ‘श्रीमंत’ योगी झाले

मुंबई : हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतरही ‘श्रीमान योगी’ राहिलेल्या शिवरायांचा इतिहास महाराष्ट्रातील आबालवृद्धांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचविणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या अनोख्या दातृत्वाने ‘महाराष्ट्र भूषण’ला नवी झळाळी दिली. राज्य शासनाचा सर्वोच्च सन्मान असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या रकमेत स्वत:चे १५ लाख घालून २५ लाखांची रक्कम पुणे येथील दीनानाथ मंगेशकर इस्पितळातील कर्करुग्णांच्या सेवेसाठी देत असल्याची घोषणा बाबासाहेब पुरंदरे यांनी यावेळी केली अन्् ‘श्रीमंत ’योगी झाल्याची अनोखी अनुभूती राजभवनातील हा सोहळा थेट टीव्हीच्या पडद्यावर पाहणाऱ्या उभ्या महाराष्ट्राला लाभली. इतिहास सोप्या रुपात जनसामान्यांपर्यंत पोहोचविणारे असंख्य साहित्यिक व कलावंतच महाराष्ट्राचे भूषण असून त्यांच्यासारखे काम करण्यासाठी यापुढेही शिवचरित्राच्या प्रचार आणि प्रसाराचे व्रत सुरूच ठेवण्याची ग्वाही ९४ वर्षीय शिवशाहीर बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरस्कार स्वीकारताना दिली.
हा पुरस्कार बाबासाहेबांना देण्याला आक्षेप घेणाऱ्यांनी निर्माण केलेल्या वादाला न जुमानता राजभवनात बुधवारी सायंकाळी राज्यपालांच्या हस्ते पुरंदरे यांना प्रदान करण्यात आला. १० लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कडेकोट बंदोबस्तात निवडक निमंत्रितांच्या साक्षीने पार पडलेल्या या समारंभात सत्कारमूर्ती बाबासाहेबांनी अत्यंत ऋजु पण सूचक शब्दांत टीकाकारांचा समाचार घेतला. ज्ञान आणि सत्य सोप्या शब्दांत जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या ज्ञानेश्वरांपासून विनोबा भावे यांच्यापर्यंतच्या परंपरेचा दाखला देत त्यांनी जाणता राजा आबालवृद्धांपर्यंत पोहोचविण्याच्या आपल्या आजवरच्या व्रतामागील भूमिका मांडली.
तत्पूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून वाद निर्माण करणाऱ्यांना छत्रपती समजलेच नाहीत. आज छत्रपती असते तर त्यांच्या नावे जातीयवाद करणाऱ्यांचा त्यांनी कडेलोटच केला असता, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या पुरस्कारावरून निर्माण झालेल्या वादावर सडकून टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आजचा समारंभ कोणाच्या भीतीने राजभवनात घेतलेला नाही. छत्रपतींच्या खऱ्या सेवकांना भीती वाटणेही शक्य नाही. देशाचे सर्वोच्च सन्मान हे राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये दिले जातात. हा पुरस्कारही राज्य शासनाचा सर्वोच्च असा सन्मान आहे म्हणून त्याचे आयोजन राजभवनात केले. आजच्या समारंभानंतर बाबासाहेबांचे अखिल महाराष्ट्रात ना भुतो ना भविष्यती असे सत्कार होतील, असा माझा विश्वास आहे.
शिवरायांच्या नावावर वाद करणाऱ्यांनी आधी शिवराय समजून घ्यावेत, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्याची माहिती समाजातील प्रत्येक माणसाला व्हावी यासाठी टीव्ही मालिका, चित्रपट काढणाऱ्यांना शासन अनुदान देईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या कामी स्वत: बाबासाहेब, इतिहासकार आणि संशोधकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)
————————————————-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे होते. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, खा. अरविंद सावंत, मुंबईच्या महापौर स्रेहल आंबेकर, आ. मंगलप्रभात लोढा आणि सांस्कृतिक कार्य सचिव वल्सा नायर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

————————————————-
मराठा आहे म्हणून
पुरंदरेंवर पे्रम करायचं नाही का?
- विनोद तावडेंचा सवाल
विनोद तावडे यांनी बाबासाहेबांना पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्यांवर टीकेची झोड उठविली. बाबासाहेबांनी लिहिलेल्या आणि सांगितलेल्या शिवचरित्रातूनच आम्हाला शिवराय कळले असे रस्त्यावरचे दहापैकी सहा जण आजही सांगतील. सुमित्राराजेंनी बाबासाहेबांना शिवशाहीर ही पदवी बहाल केली होती. अशा बाबासाहेबांवर मी मराठा आहे म्हणून प्रेम करायचे नाही काय, असा सवाल तावडे यांनी केला.
बाबासाहेबांना पुरस्कार देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अडचण करण्याचा हेतू होता, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यांचा उल्लेख न करता तावडे म्हणाले की, हे कुठल्या डोक्यातून आले, कोणाचा शोध आहे हेच कळत नाही. बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय माझ्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला आणि मुख्यमंत्र्यांनी त्यास सहमती दिली, याचा मला आनंद आणि अभिमान आहे.
या पुरस्कारावर अनेकांनी बाजूने आणि विरोधात लिहिले पण आज उच्च न्यायालयाने बाबासाहेबांच्या पन्नास वर्षांच्या कामगिरीला पावतीच दिली आणि त्यांना महाराष्ट्रभूषण देण्याचा निर्णय उचित ठरविला, असे तावडे म्हणाले.
बाबासाहेबांना पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पूरक ठरतील असे पुरावे गोळा केले असते तर बरे झाले असते पण हे काम आमचे सरकार करीत असून हे सगळे पुरावे आम्ही न्यायालयापुढे सादर करू, असे तावडे म्हणाले. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आधी कोणी काही केले नाही आमच्या सरकारने समिती स्थापन केली, असे त्यांनी सांगितले.
————————————————
बाळासाहेबांनी त्यांची
सालटीच काढली असती
उद्योग मंत्री देसाई म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व बाबासाहेबांचे ममत्व शब्दांपलिकडचे होते. बाळासाहेब आज असते तर पुरस्काराला विरोध म्हणून माकडचेष्टा करणाऱ्यांची त्यांनी सालटीच काढली असती. बाबासाहेबांना हा पुरस्कार दिल्याने या पुरस्काराची मालिका समृद्धच झाली आहे.
————————————————-

————————————————
————————————————-
पवारांकडून बाबासाहेबांची प्रशंसा
आजच्या समारंभात बाबासाहेब पुरंदरे यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्रावर आधारित एक ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. त्यात मान्यवरांनी बाबासाहेबांबद्दल व्यक्त केलेल्या भावना होत्या. त्यांच्या कार्याची प्रशंसा करणारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाचा अंश दाखविला जात असताना सभागृहात हशा उमटला.

राजभवनच्या दरबार हॉलमधील वातावरण आज शिवमय करण्यात आले होते. मागील बाजूस शिवरायांचा पुतळा, गडकिल्ल्याची सजावट यांच्या साक्षीने हा समारंभ झाला.
भाजपा, शिवसेनेचे अनेक मंत्री, आमदार, खासदार समारंभाला उपस्थित होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. काँग्रेस-राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित नव्हता.
पं. शंकर अभ्यंकर, चित्रकार वासुदेव कामत, डॉ. तात्याराव लहाने आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे वा ठाकरे परिवारातील कोणीही हजर नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर समारंभाला ते आमंत्रण नसतानाही आले असते, असे मात्र उद्योगमंत्री सुभाष देसाई भाषणात म्हणाले.

राष्ट्रप्रेमाचे बीजारोपण
शिवशाहीर पुरंदरे यांनी जाणता राजा, शिवरायांवरील लिखाण आणि व्याख्यांनाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाचे बीजारोपण केले. शिवरायांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली, हा इतिहास मांडताना स्फुल्लिंग पेटविले, असे प्रशांसोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

विरोध करणाऱ्यांवर टीकेची झोड
विनोद तावडे यांनी बाबासाहेबांना पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्यांवर टीकेची झोड उठविली. बाबासाहेबांनी लिहिलेल्या आणि सांगितलेल्या शिवचरित्रातूनच आम्हाला शिवराय कळले, असे रस्त्यावरचे दहापैकी सहा जण आजही सांगतील. सुमित्राराजेंनी बाबासाहेबांना शिवशाहीर ही पदवी बहाल केली होती. अशा बाबासाहेबांवर मी मराठा आहे म्हणून प्रेम करायचे नाही काय, असा सवाल तावडे यांनी केला.

खोडसाळ याचिकाकर्त्यांना १० हजार दंड
खेळाडू व कलाकार हे पैशासाठीच काम करीत असतात. त्यामुळे बळवंत मोरेश्वर पुरंदरे (बाबासाहेब) हे केवळ पैशासाठीच काम करीत होते, या मुद्द्यावर त्यांना पुरस्कार नाकारला जाऊ शकत नाही, असे मत व्यक्त करीत उच्च न्यायालयाने पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात दाखल झालेली जनहित याचिका फेटाळली.

Web Title: ... An 'Shrimant' became a yogi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.