"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:35 IST2025-11-06T18:35:20+5:302025-11-06T18:35:59+5:30
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल आणि निकाल भगव्याचाच येणार. विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची तयारी सुरू आहे असं आवाहन शिंदेंनी कार्यकर्त्यांना केले.

"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
पुणे - मुख्यमंत्री असताना तुम्ही घरात बसलात, फेसबुकवरून राज्य चालत नाही. जनता संकटात असताना रस्त्यावर उतरावं लागतं. आता शेतकऱ्यांच्या बांधावर फिरताय...पण कमरेवर हात ठेवून उभं राहू नका, या आमच्यासारखे देणारे हात बना अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे.
चाकण येथील सभेत एकनाथ शिंदे म्हणाले की, अरे मुख्यमंत्री असताना घरात बसलात, फेसबुकवरून राज्य चालत नाही! जनतेला संकट आलं की आम्ही रस्त्यावर उतरतो. बांधावर फिरतो, शेतकऱ्यांच्या शेतात उभे राहतो. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. आम्ही ‘देना बँक’, ते मात्र ‘लेना बँक’ आहेत. अडीच वर्षे मुख्यमंत्री असूनही घरात बसलात. राज्य संकटात असताना फेसबुक लाईव्हवरून भाषणं देत बसलात. जनतेला त्याचा काय उपयोग झाला? आम्ही कोल्हापूरचा पूर असो, ईर्शाळवाडीचं दु:ख असो स्वतः घटनास्थळी जाऊन उभे राहिलो. निर्णय घेतले, निधी दिला, लोकांना दिलासा दिला. आम्ही काम करतो, फक्त टीका करत नाही असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय भगव्याचं ठाणे आहेच, पण आता भगव्याचं पुणे करायचं आहे. अतुल देशमुख यांच्या प्रवेशामुळे उत्तर पुण्याची ताकद वाढली आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय. आता गुलाल उधळण्याची तयारी करा. विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं, कर्जमाफीचं वचन पाळलं. लाडकी बहीण योजना सुरू केली, महिलांना अर्धं तिकीट दिलं, शेतकऱ्यांना दुहेरी अनुदान दिलं. आम्ही बोलत नाही, थेट देतो. काही लोकं फक्त बोलतात, फोटो काढतात, पोस्ट टाकतात, पण जनतेला काही मिळत नाही असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल आणि निकाल भगव्याचाच येणार. विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची तयारी सुरू आहे, त्यामुळे गुलाल उधळण्यासाठी सज्ज व्हा. काही जण आम्हाला भकास म्हणतात. अरे, अडीच वर्षांत महाराष्ट्र पालथा घातला, पायाला भिंगरी लावली, मुख्यमंत्री राहताना तुम्ही काय केलंत? आम्ही सर्वसामान्यांसाठी काम केलं. हा पक्ष कोणाचा मालकी हक्क नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो काम करेल, तो पुढे जाईल. बाळासाहेबांनी सांगितलं शिवसेनेतील सगळ्यात मोठं पद म्हणजे शिवसैनिक, आम्ही ते जपलंय आणि जपत राहू. आमचं सरकार काम करणाऱ्यांचं आहे. फक्त बोलणाऱ्यांचं नाही असंही शिंदेंनी सांगितले.