'ती' जखम राज ठाकरेंच्या मनाला वेदना देणारी; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 13:26 IST2022-11-28T13:26:00+5:302022-11-28T13:26:36+5:30

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समाचार घेतला.

Shiv Sena leader Neelam Gore's criticism On Raj Thackeray, Eknath Shinde | 'ती' जखम राज ठाकरेंच्या मनाला वेदना देणारी; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची बोचरी टीका

'ती' जखम राज ठाकरेंच्या मनाला वेदना देणारी; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची बोचरी टीका

सोलापूर - आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागलेत. त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईत पक्षाच्या गटाध्यक्षांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज यांनी राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवरही घणाघात केला. राज ठाकरेंनीउद्धव ठाकरेंची नक्कल केली. त्यावरून शिवसेना नेत्यांनी आता राज ठाकरेंवर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. त्यात शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. 

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांनी तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ती जखम आजही राज ठाकरेंच्या मनाला वेदना देत आहे. त्यामुळे ते बेताल पद्धतीने टीका करतात. जे व्यंग नाहीत त्याला शोधून आणायचे आणि मिमिक्री करायची याला दूषित दृष्टी म्हणतात किंवा सडलेली दृष्टी म्हणतात असा घणाघात त्यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समाचार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फ्रिज खोकेबाबतची टीका निराधार आहे. परिस्थितीमुळे एकनाथ शिंदे मजबूर आहेत. उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. जसं नारायण राणेंचं झालं तसंच शिंदे गटांचं झालंय वाटतं असं म्हणत नीलम गोऱ्हेंनी एकनाथ शिंदेंचा समाचार घेतला. 

महाराष्ट्राचा अभिमन्यू करण्याचा डाव
महाराष्ट्राच्या निर्मितीला फार मोठा इतिहास आहे. बिदर भालकी बेळगाव सह अन्य भाग महाराष्ट्राला जोडले गेले पाहिजे ही आपली भूमिका आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार राज्यांची निर्मिती झाली असली तरी बेळगावात मराठीचा अपमान होतो तसा महाराष्ट्रात कानडीचा अपमान होत नाही. सामोपचाराचा वसा केवळ महाराष्ट्राने घेतलेला नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत त्याद्वारे न्याय संस्थेवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे आहे. ते अगदी हातपाय आपटत आहेत. त्यांच्यामागे नक्कीच कुणीतरी आहे. महाराष्ट्राचा अभिमन्यू करण्याचा हेतू मराठीद्वेषी लोकांचा आहे असं वाटतंय असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. सोलापूरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 
 

Web Title: Shiv Sena leader Neelam Gore's criticism On Raj Thackeray, Eknath Shinde