लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई मुंबई महानगरपालिका :निवडणुकीत हिंसाचार करणान्या कायदा हातात घेणाऱ्या मनसेबरोबर युती न करण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाबरोबर मुंबईत युती व्हावी यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.
मविआमध्ये काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार गट असे तीन प्रमुख पक्ष आहेत. मतचोरीच्या मुद्यावर मनसेचीही जवळीक वाढली होती. त्यातच उद्धवसेना आणि मनसे एकत्र येणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे हिंदी भाषिकांविरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनसेबरोबर युती करणार नाही, अशी भूमिका घेत मुंबईत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, त्याचवेळी शरद पवार गटाला आपल्याबरोबर घ्यावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्याअनुषंगाने वर्षा गायकवाड यांच्यासह अस्लम शेख, अमीन पटेल, ज्योती गायकवाड यांनी पवार यांची भेट घेतली.
समाजवादी पक्ष स्वबळावर १५० जागा लढविणार
समाजवादी पक्ष मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असून, १५० जागा आम्ही लढविणार आहोत, असे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसीम आझमी यांनी पत्र परिषदेत जाहीर केले. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संविधानाच्या चौकटीतील भूमिकेला साथ- सुप्रिया सुळे
महाराष्ट्र, मुंबईच्या हितासाठी जे योग्य असेल, तसेच संविधानाच्या चौकटीत असेल, त्या भूमिकेला आमची नेहमीच साथ असेल आणि पुढेही राहील, असे सुप्रिया सुळे यांनी या भेटीबाबत बोलताना सांगितले. पुढील आठवड्यात बसून आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत. काँग्रेससोबत आमची कायम सहकार्याची भूमिका राहिली आहे. ती पुढेही राहील. एका आठवड्यात पूर्ण चित्र स्पष्ट होईल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भाजप म्हणते... अजित पवार गटाशी युती नाही, जबाबदारी मलिकांवर
१ मनी लाँड्रिंगप्रकरणी जामिनावर सुटलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी अजित पवार गटाने घेतला आहे. या निर्णयाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष २ शेलार यांनी विरोध करत मलिक यांच्यावरील आरोप गंभीर असल्याने अजित पवार गटासोबत मुंबईत युती केली जाणार नाही. ही कार्यकर्त्यांची भूमिका असून, मलिक यांच्यासोबत आम्ही जुळवून घेऊ शकत नाही, असा इशारा दिला आहे.
उद्धव आले तर स्वागतच!
लोकशाही व संविधान माननाऱ्या पक्षांशी आघाडी करून लढवण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे. काँग्रेस व शरद पवार गटाची नैसर्गिक आघाडी असून, दोन्ही पक्ष लोकशाही व संविधानवादी आहेत. आघाडीसंदर्भात शरद पवार गटाशी चर्चा सुरू असून, लवकरच त्यासंदर्भातील निर्णय होईल, असे वर्षा गायकवाड यांनी या भेटीनंतर सांगितले. या आघाडीत उद्धव ठाकरे आले तर त्यांचे स्वागतच आहे, असेही त्यांनी सांगितले. स्वबळाची घोषणा केल्यानंतर काँग्रेस आता १५ दिवसांची मुंबई जोडो यात्रा काढणार आहे. या यात्रेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत.
Web Summary : Despite declaring a solo bid, Congress is trying to ally with Sharad Pawar's group for Mumbai elections. Discussions are ongoing, with a decision expected soon. Samajwadi Party will contest 150 seats alone. BJP opposes alliance with Ajit Pawar faction due to Nawab Malik's involvement.
Web Summary : अकेले चुनाव लड़ने की घोषणा के बावजूद, कांग्रेस मुंबई चुनावों के लिए शरद पवार समूह के साथ गठबंधन करने की कोशिश कर रही है। चर्चा जारी है, जल्द ही निर्णय की उम्मीद है। समाजवादी पार्टी 150 सीटों पर अकेले चुनाव लड़ेगी। नवाब मलिक की भागीदारी के कारण भाजपा ने अजित पवार गुट के साथ गठबंधन का विरोध किया।