सातारी वाघासाठी शिवकालीन पिंजरा
By Admin | Updated: October 8, 2015 01:08 IST2015-10-07T21:10:43+5:302015-10-08T01:08:51+5:30
‘दगडी सापळा’ देतोय साक्ष : सातारकरांच्या पूर्वजांनीही केला होता वन्यजीवांशी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न--लोकमत विशेष

सातारी वाघासाठी शिवकालीन पिंजरा
सातारा : शेत-शिवारात क्वचित दिसणारा बिबट्या शहरातून जाणाऱ्या महामार्गावर, पोवई नाक्यावर किंवा एखाद्या कॉलनीत दिसल्यामुळं सातारकरांनी भुवया उंचावण्याची काहीच गरज नाही. याच पट्ट्यात वाघोबांची डरकाळी शेकडो वर्षांपासून घुमते आहे आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याची परंपराही आपल्याला आहे, याची साक्ष याच पट्ट्यातील जुना दगडी पिंजरा देतो आहे.
महामार्गावर खिंडवाडीजवळ सव्वा वर्षांत दोन राजस बिबट्यांनी अपघातात प्राण गमावला. पोवई नाक्यावर पाच दिवसांपूर्वी पहाटे फिरून गेलेले ‘पाहुणे’ बिबट्याचे बछडे असण्याची दाट शक्यता आहे. शाहूनगरात बिबट्याने पाळीव कुत्रा पळवला. वन्यजीवांचे शहरात येणे-जाणे वाढते आहे की त्यांची संख्या वाढते आहे, असा प्रश्न सातारकरांना पडणे स्वाभाविक आहे; पण शेकडो वर्षांपासून याच भागात वाघोबांची डरकाळी घुमते आहे, याचा ऐतिहासिक आधार म्हणून आपण शाहूनगरपासून जवळच डोंगरावर असलेल्या दगडी पिंजऱ्याकडे पाहू शकतो, असे इतिहासाच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे.शाहूनगरमध्ये ज्या इमारतीसमोरून बिबट्याने पाळीव कुत्रा रविवारी रात्री पळवून नेला, तिथून डोंगराकडे पाहिल्यास सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचा दगडी पिंजरा आपल्याला दिसतो. गाडीवाटेने अजिंक्यताऱ्याकडे जाताना वाटेत मंगळाईचे देऊळ लागते. या देवळाच्या रस्त्यापासून थोडे खाली गेल्यास झऱ्यावर बांधलेला प्राचीन कुंड दिसतो. या कुंडापासून जवळच वरच्या बाजूस दगडाचे जुने बांधकाम दिसते. प्रथमदर्शनी एखादे भुयार असावे, असा समज होतो; परंतु ते भुयार नसून जंगली श्वापदांना पकडण्याचा दगडी पिंजरा आहे. आतमध्ये भुयारासारखे साधारण दहा फूट लांब बांधकाम आणि त्याच्या तोंडावर तीन
दगडांची चौकट, अशी ही रचना
आहे.काळाच्या ओघात वन्यजीवांच्या भ्रमंतीच्या मार्गाजवळील जमिनींच्या वापरात बदल झाले.
पूर्वी जंगल जमिनींचा वापर बदलल्यास जास्तीत जास्त तिथे शेती होत असे; परंतु आता घरे, इमारती, वसाहती उभ्या राहतात. दगडी पिंजरा ज्या काळी बांधला तेव्हा बिबट्याच नव्हे, तर पट्टेरी वाघही शहराच्या अगदी जवळ होते. परंतु त्यांची शिकार न करता त्यांना जिवंत पकडण्यासाठीच या पिंजऱ्याची निर्मिती केली असावी, असे अनुमान त्याच्या रचनेवरून काढता येते. (प्रतिनिधी)
पिंजऱ्याची रचना आणि वापर
डोंगरावरच्या नैसर्गिक झऱ्यावर भिंत बांधण्यात आली असून, त्यावर एक कुंड बांधण्यात आला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या पाणवठ्यावर वाघ, बिबट्या येईल तेव्हा त्याला पकडण्यासाठी कुंडाच्या वरच्या बाजूला दगडी पिंजरा बांधण्यात आला आहे.
पिंजऱ्याच्या आत एक लोखंडी कडी होती. सध्या ती दिसत नसली, तरी दहा-बारा वर्षांपूर्वी दिसत होती. या कडीला शेळी बांधून वाघाला आकर्षित केले जात असावे.
दोन उभे मोठे दगड आणि त्यावर झाकण म्हणून आडवा एक दगड अशी रचना आहे. उभ्या दगडांना आडव्या खाचा असून, आडव्या दगडाला उभी खाच आहे. या खाचा एकमेकात बसवून ड्रॉवरप्रमाणे पिंजरा बंद करण्याची सोय असावी, असा कयास आहे.
वर झाकण्याचा दगड आता पिंजऱ्यापासून बाजूला पडल्याचे दिसते. येथे गुप्तधन असावे, या शक्यतेने मधील काळात तेथे कुणीतरी शोधाशोध केली असावी, असा अंदाज बांधता येतो.
शेळीकडे आकर्षित झालेला वाघ किंवा अन्य श्वापद दोन उभ्या भिंतींच्या मध्ये आले की आत पडत असावा. त्याच वेळी वरून आडवा दगड टाकून त्याला जेरबंद केले जात असावे, असा निष्कर्ष काढता येतो.
तीनशे वर्षांहून अधिक जुना
दगडी पिंजऱ्याचे जुने संदर्भ सध्या मिळत नाहीत. परंतु दगडाचा आकार मोठा असल्याने बांधकाम तीनशे वर्षांहून अधिक जुने असावे आणि ते राजाश्रयाने झालेले असावे, हे नक्की आहे. कारण असे मोठे काम करवून घेणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्याकाळी वाघांचा त्रास वाढला असावा आणि त्यांना पकडण्यासाठी हा सापळा केला असावा, असे त्याच्या रचनेवरून स्पष्ट होते.
- नीलेश पंडित, जिज्ञासा इतिहास संशोधन संस्था
प्राचीन बांधकाम : रचनाकार वन्यजीवांचा जाणकार
पिंजऱ्याच्या बांधकामाच्या शैलीवरून ते बरेच प्राचीन असावे आणि ज्याने कोणी या पिंंजऱ्याची जागा निवडली, तो वन्यजीवांचा जाणकार असावा, हे पटते. या पिंजऱ्याची जागा आताच्या शाहूनगरच्या बरोबर वरच्या बाजूला आहे. वन्यजीवांचे भ्रमणमार्ग सहसा बदलत नाहीत. विशेषत: पाणवठे त्यांना बरोबर माहीत असतात आणि असाच पाणवठा हेरून हा पिंजरा बांधला असावा, असे अभ्यासकांचे मत आहे.