उष्माघाताचा दुसरा बळी, धुळ्यातील महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: March 30, 2017 11:34 IST2017-03-30T11:33:55+5:302017-03-30T11:34:36+5:30

राज्यात उष्माघाताचा दुसरा बळी गेला आहे. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात उष्माघातामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Second heat wave, death of Dhule woman | उष्माघाताचा दुसरा बळी, धुळ्यातील महिलेचा मृत्यू

उष्माघाताचा दुसरा बळी, धुळ्यातील महिलेचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 30 -  राज्यात उष्माघाताचा दुसरा बळी गेला आहे. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात उष्माघातामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मालती निकुंभे (49 वर्षे)असं मृत महिलेचं नाव असून त्या बाभुळदे गावातील माजी सरपंच होत्या. 
बुधवारी राज्यातील उष्माघाताचा पहिला बीडमध्ये गेला होता. बीडमध्ये रुपाबाई पिसळे (67)यांचा उष्माघातामुळे बळी गेला. रुपाबाई पिसळे या नांदुरघाटातील रहिवासी होत्या.
 
गेल्या दोन दिवसांत राज्यातील तापमानाने चाळीशी गाठली आहे. याचा नागरिकांना वाईट परिणाम होत आहे. 
उन्हाच्या तडाख्यामुळे लोकांना घराबाहेर पडणं कठिण झालं आहे.  वाढत्या तापमानामुळे व बदलामुळे पुढील 72 तास नागरिकांना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 
 
दरम्यान, मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट कायम असून पुढील 24 तासांत अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबईतही तापमानात वाढ झाल्यानं नागरिक हैराण झाले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील/ विभागीय स्तरावरील/ महानगरपालिका अंतर्गत आरोग्य यंत्रणांशी समन्वय साधून उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. 
(बीडमध्ये उष्माघाताचा पहिला बळी)
(रायगडमधल्या भीरामध्ये 46.5 अंश सेल्सियस तापमान)
(कडक उन्हात बाहेर फिरणे टाळा)
 
काय करावे 
1.तहान नसेल तरीही जास्तीत जास्त पाणी प्यावे
2.हलके, पातळ व सच्छिद्र सूती कापड घालावे
3.बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलांचा वापर करावा
4.प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत घ्यावी
5.उन्हात काम करताना डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसंच ओल्या कापडाने डोकं, मान व चेहरा झाकावा
6.शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक इत्यादींचं सेवन करावं
7.अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हं ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
8.आपलं घरं थंड ठेवा, पडदे लावा, सनशेड बसवा आणि शक्य असल्यास रात्री खिडक्या उघड्या ठेवा
9.पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामं उरकावीत
10.जनावरांनाही सावलीत ठेवा आणि पुरेसे पाणी द्या.
11.थंड पाण्याची आंघोळ करा  
 
हे करू नका
1. दुपारी 12 ते 3 उन्हात फिरू नका.
2. मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ ड्रिंक्स पिणं टाळा, त्यामुळे डिहायड्रेशन होतं.
3. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळं अन्न खाऊ नका. 
4. पार्किंग केलेल्या वाहनात मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका. 
 
यंदा सरासरी ९५ टक्के पाऊस : जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट संस्थेने व्यक्त केला आहे़ त्यात ५ टक्के कमी-अधिक फरक पडू शकतो़ देशभरात ८८७ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ एलनिनोचा प्रत्यक्ष प्रभाव जुलैनंतर जाणवण्याची शक्यता आहे. जूनमध्ये १०२, जुलैमध्ये ९४, आॅगस्टमध्ये ९३ तर सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 

Web Title: Second heat wave, death of Dhule woman