उन्हाचे परीक्षार्थींच्या पायाला चटके; भार्इंदरच्या परीक्षा केंद्रात परीक्षार्थी अनवाणी
By Admin | Updated: May 7, 2017 18:16 IST2017-05-07T18:16:37+5:302017-05-07T18:16:37+5:30
परीक्षार्थ्यांना बुटासह सर्वप्रकाराच्या चप्पल घालून परीक्षेला बसण्यास मनाई केल्याने उन्हात परीक्षार्थ्यांच्या पायाला चटके बसल्याची चीड पालकांमधून व्यक्त होत होती.

उन्हाचे परीक्षार्थींच्या पायाला चटके; भार्इंदरच्या परीक्षा केंद्रात परीक्षार्थी अनवाणी
राजू काळे/ऑनलाइन लोकमत
भार्इंदर, दि. 7 - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) रविवारी देशव्यापी नीट (एनईईटी) या वैद्यकीय पूर्व परीक्षेचे आयोजन केले होते. त्यात परीक्षार्थ्यांना बुटाखेरीज चप्पलांसह परीक्षेला बसण्याची अट सीबीएसईने घातली असताना देखील मीरारोड येथील सेव्हन स्क्वेअर अॅकेडमी परीक्षा केंद्रात मात्र परीक्षार्थ्यांना बुटासह सर्वप्रकाराच्या चप्पल घालून परीक्षेला बसण्यास मनाई केल्याने उन्हात परीक्षार्थ्यांच्या पायाला चटके बसल्याची चीड पालकांमधून व्यक्त होत होती.
ठाणे जिल्ह्यातील मीरा-भार्इंदर मधील सेव्हन स्क्वेअर अॅकेडमी या केंद्रात जिल्ह्याच्या विविध भागांतून सुमारे 600 परीक्षार्थी आपल्या पालकांसह सकाळी 6 वाजल्यापासूनच हजर होत होते. उन्हाचा पारा चढताच पालकांनी परीक्षार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याची विनंती शाळेकडे केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला सुनावण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने परीक्षार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. यानंतर मुलांना उन्हापासून बचाव करण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध न करता त्यांना सुमारे तासभर उन्हातच उभे करण्यात आले. तसेच सीबीएसईच्या निर्देशानुसार परीक्षार्थ्यांना पायात बूट घालून तसेच इतर वर्जित साहित्यांसह परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आली होती. परंतु स्लिपर्स आणि कमी उंचीच्या सॅण्डल्स घालून परीक्षेला बसून देण्यास अनुमती देण्यात आली होती. शाळेने मात्र सर्वच परीक्षार्थ्यांना बुटासह सर्व प्रकारच्या चप्पला घालून परीक्षेला बसण्यास मनाई करीत त्या शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच काढून ठेवण्याचे आदेश देण्यात आले. परंतु स्लिपर्स घालून आलेल्या काही परीक्षार्थ्यांना मात्र परवानगी देण्यात आली. तसेन मुलींनी सोबत असलेल्या हेअर पिन्स, हेअर बॅण्डसह इतर वस्तू देखील प्रवेशद्वाराजवळच काढून ठेवण्यास बजावण्यात आले.
चप्पला काढून ठेवल्याने परीक्षार्थ्यांनी अनवाणी परीक्षा दिल्या. परीक्षा संपल्यानंतर उन्हाचा चटका सहन न झाल्याने ते पळत सुटले व सावलीच्या आडोशाखाली आपापल्या चप्पला घातल्या. शाळेच्या या बेजबाबदार वृत्तीमुळे पालकांनी संताप व्यक्त करीत सीबीएसईच्या निर्देशानुसार केवळ बुटांना परवानगी नसताना सर्वच मुलांच्या चप्पलांना परवानगी का नाकारण्यात आली, अशी विचारणा केली. याबाबत शाळेतील सुरक्षारक्षकांना विचारले असता त्यांनी सीबीएसईच्या निर्देशाकडे बोट दाखवून अधिक सांगण्यास नकार दिला.