सवरांच्या राजीनाम्याची मागणी
By Admin | Updated: September 17, 2016 03:40 IST2016-09-17T03:40:44+5:302016-09-17T03:40:44+5:30
आदिवासी भागांतील कुपोषित बालकांच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्यावर हल्लाबोल करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

सवरांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई : आदिवासी भागांतील कुपोषित बालकांच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्यावर हल्लाबोल करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी अशा असंवेदनशील मंत्र्याला मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील आदिवासी विकास विभागाचा हा हलगर्जीपणा असल्याची टीका केली आहे.
बालकांच्या मृत्यूबाबत सवरा यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करताना विखे पाटील म्हणाले की, आदिवासी विकासमंत्र्यांच्याच विधानसभा मतदारसंघात कुपोषण होत असून, शासकीय मदतीअभावी बालके मृत्युमुखी पडत आहेत. तरीही त्याची गंभीरतेने दखल न घेतली गेल्यामुळे राज्यपालांना संबंधित खात्यांच्या मंत्र्यांची झाडाझडती घ्यावी लागली हे सरकारचे अपयश आहे.
सरकारने आदिवासी भागात उत्तम काम सुरू असल्याचे दावे करून नेहमीप्रमाणे स्वत:ची पाठ थोपटून घेतली. सरकारचे हे सर्व दावे फोल ठरल्याचे बालमृत्यूच्या वाढत्या संख्येतून स्पष्ट होते, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडेंचा पंकजाच्या विभागावर हल्ला
हलगर्जीपणा व असंवेदनशीलतेला आदिवासी विकास विभागाबरोबरच सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभाग जबाबदार असल्याचा आरोप करीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या खात्यांनाही लक्ष्य केले.
पालघर व ठाणे जिल्ह्यांतील कुपोषणग्रस्त आदिवासी भागांचा आपण शनिवारी दौरा करणार असून, मोखाडा, खोच, खर्डी, कळंबवाडी, वाडा भागातील कुपोषणग्रस्त गावांना भेट देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईसारख्या महानगरापासून जवळच असलेल्या आदिवासी भागाचे कुपोषण सोडवण्यात शासनाचे अपयश ही दुर्दैवी बाब असल्याचे मुंडे म्हणाले.
निधीचे योग्य नियोजन नाही - तटकरे
पालघरच्या मोखाडा तालुक्यातील ६०० कुपोषणग्रस्त मुलांच्या मृत्यूला राज्य सरकारच जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. आदिवासी विकास योजनांना निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही निधीचे योग्य नियोजन होत नसल्याचा आरोप तटकरे यांनी केला.
‘६०० मुले गेली तर जाऊ द्या ना मग..’ असे आदिवासी विकासमंत्र्यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य म्हणजे संवेदनहीनतेचा कळस आहे, असे तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादीचे आ. पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादी पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांच्यासह कुपोषणग्रस्त मोखाडा भागाची पाहणी केली. राज्यात सर्वांत जास्त कुपोषण आदिवासी विकासमंत्र्यांच्या मतदारसंघात असून, कुपोषण निर्मूलनात विष्णू सवरा निष्प्रभ ठरले असल्याचा आरोप बरोरा यांनी केला.
सवरा यांच्या पुतळ्याचे ठाण्यात दहन
ठाणे : हे सरकार आदिवासी, मागासवर्गीय आणि मराठा समाजाची फसवणूक करीत आहे. आदिवासी मुलांचा कुपोषणाने जीव जात असताना आदिवासीमंत्री त्यांची टिंगल करत आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्यातून आपला गाशा गुंडाळावा, अशी घोषणाबाजी करून ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आदिवासीमंत्री विष्णू सवरा यांच्या पुतळ्याचे शुक्रवारी ठाण्यात दहन केले. पालघर जिल्ह्यात ३ आदिवासी बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला होता. या कुपोषणावर बोलताना, विष्णू सवरा यांनी ६०० जण तर नाही मेले ना, असे वक्तव्य केले. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मध्यवर्ती पक्ष कार्यालयाबाहेर सवरा यांचा पुतळा दहन केला. हे आंदोलन पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. याप्रसंगी युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मंदार केणी, संदीप जाधव, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अभिजित पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.