तोडा फोडा ही राष्ट्रवादीची नीती; मिटकरी हा त्यांच्या तमाशाच्या फडावरचा...; सदाभाऊ खोत यांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 11:38 IST2022-04-26T11:09:22+5:302022-04-26T11:38:42+5:30

Sadabhau Khot : आघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादीची युती आहे. सरकारमध्ये गुंडगिरी उफाळून आली आहे. या सर्व विषयावर जनतेमध्ये जाऊ आणि संघर्ष उभा करू, असेही सदाभाऊ खोत म्हणाले. 

Sadabhau Khot statement on MLC Amol Mitkari and Sharad Pawar | तोडा फोडा ही राष्ट्रवादीची नीती; मिटकरी हा त्यांच्या तमाशाच्या फडावरचा...; सदाभाऊ खोत यांचं टीकास्त्र

तोडा फोडा ही राष्ट्रवादीची नीती; मिटकरी हा त्यांच्या तमाशाच्या फडावरचा...; सदाभाऊ खोत यांचं टीकास्त्र

सांगली : आमदार अमोल मिटकरी यांच्यावर टीका करताना नेते सदाभाऊ खोत यांची जीभ चांगलीच घसरली. अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाच्या आहे, असे आक्षेपार्ह वक्तव्य माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जातीयवादाला खतपाणी घातल्याचा आरोप त्यांनी केला. सदाभाऊ खोत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

सदाभाऊ खोत यांनी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे. त्यांचे फार मनावर घेण्याचा प्रश्न नाही. तोडा फोडा अशी राष्ट्रवादीची नीती आहे. अनेक नेते प्रत्येक समाजाचे घ्यायचे जातीयवाद करायचा आणि पवार साहेब आपले तारणहार आहेत. हे समाजाला समजावण्याचा काम राष्ट्रवादीमधील नेते करतात, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 

महाविकास आघाडी हे विकास कामावर बोलायला तयार नाही. पण एक शकुनी मामा सतरंजीवरती चाल खेळून दुसरीकडे लक्ष केंद्रित करण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. ज्या बाजूला शकुनीमामाचा सुळसुळाट असतो, त्याची सेना कौरवाची सेना असते आणि आम्ही पांडवाची सेना या कौरवांचा नाश करेल, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केली.

जागर शेतकऱ्याचा आक्रोश बहुजनांचा हे राज्यव्यापी अभियान 29 एप्रिल पासून कोकणातून सुरू करत आहोत. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्याच्या आत्महत्या, लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाविकास आघाडी सरकारची केवळ फालतू गिरी सुरू आहे. हे सरकार भरतीवर बोलत नाही. आरोग्य भरतीमध्ये घोटाळा केला आहे. हे सर्व जनतेसमोर या अभियानातून मांडण्यात येणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. मातोश्री बाहेर डायलॉग बाजी करतील. एक आजी बाई आली आणि डायलॉग बाजी केली आणि मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले. या महाराष्ट्रात अनेक आज्जी बाई आहेत. त्याचे डोळे पुसण्यासाठी वेळ मिळाला का? असा सवाल करत सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादीची युती आहे. सरकारमध्ये गुंडगिरी उफाळून आली आहे. या सर्व विषयावर जनतेमध्ये जाऊ आणि संघर्ष उभा करू, असेही सदाभाऊ खोत म्हणाले. 

Web Title: Sadabhau Khot statement on MLC Amol Mitkari and Sharad Pawar