१३ बँकांना २००० कोटींचा गंडा
By Admin | Updated: May 15, 2016 05:18 IST2016-05-15T05:18:56+5:302016-05-15T05:18:56+5:30
बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांची नावे जाहीर करा ही मागणी जोर धरत असतानाच एका कंपनीने १३ बँकांना २००० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा महाघोटाळा समोर आला आहे.

१३ बँकांना २००० कोटींचा गंडा
सोपान पांढरीपांडे, नागपूर
बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांची नावे जाहीर करा ही मागणी जोर धरत असतानाच एका कंपनीने १३ बँकांना २००० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा महाघोटाळा समोर आला आहे. या महाघोटाळ्याचा सर्वाधिक फटका बँक आॅफ महाराष्ट्रला (महाबँक) बसण्याची शक्यता आहे. बँकेचे जवळपास १ हजार कोटी अडकले आहेत.
हा घोटाळा फेब्रुवारी २०१५मध्ये महाबँकेत उघडकीस आला आणि आता सीबीआय या घोटाळ्याची चौकशी करीत आहे. महाबँकेतील सूत्रांनुसार, सुरत येथील सिद्धिविनायक लॉजिस्टिक लिमिटेड या मालवाहतूक कंपनीने १३ बँकांना अडचणीत आणले आहे. याच प्रकरणात ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वात या बँकांनी कर्ज वसुलीसाठी निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु कर्ज देताना सर्वच बँकांनी मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याने कर्ज वसूल होण्याची शक्यता धूसरच आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सिद्धिविनायकने २०१२ साली ‘चालक से मालक’ योजनेचा प्रस्ताव बँकांना दिला. यानुसार बँकांनी चालकांना ट्रकसाठी कर्ज द्यायचे व सिद्धिविनायकने या चालकांना काम द्यायचे व ट्रकभाड्यापोटी दिल्या जाणाऱ्या रकमेतून कर्जाचे हप्ते बँकेत भरायचे, अशी ही योजना होती. त्यानुसार सिद्धिविनायकने २०१२ ते २०१५च्या दरम्यान अंदाजे ६ हजार चालकांच्या नावे १६०० ते १७०० कोटी कर्ज १३ बँकांकडून घेतले. परंतु कुणाच्याच कर्जाची परतफेड केली नाही. ३१ मार्च २०१५ रोजी व्याजासह कर्जाची रक्कम तब्बल २१७० कोटी रुपये झाली होती. देशातील सर्वांत मोठा ट्रक ताफा
कंपनी मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार सिद्धिविनायक लॉजिस्टिक लिमिटेड ही कंपनी रूपचंद बैद यांनी २००२ साली अहमदाबाद येथे रजिस्टर केली आहे. कंपनीचे मुख्यालय सुरतला आहे. कंपनीच्या वेबसाईटवर सिद्धिविनायकजवळ देशातील सर्वांत मोठा ६ हजारहून अधिक ट्रकचा ताफा असल्याचा दावाही केला आहे.‘लोकमत’जवळ उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार, बहुतांश बँकांनी कर्ज प्रकरणात आवश्यक दस्तावेज प्राप्त न करता किंवा कर्जाची आरसी बुकमध्ये नोंद न करता अथवा बिले न घेताच कर्जाची रक्कम वाहन कंपन्यांना परस्पर दिली असल्याचे दिसत आहे.या प्रकरणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी वित्तमंत्री अरुण जेटलींना २३ एप्रिल २०१६ला लिहिलेले पत्रही ‘लोकमत’जवळ आहे. या पत्रात, चालकांना जुने ट्रक विकून सिद्धिविनायकने कर्जाची रक्कम बळकावली, तर नव्या ट्रकच्या बाबतीत सिद्धिविनायकने बँकांना वाहन कंपन्यांना परस्पर रक्कम द्यायला लावून त्यातून आपली देणी फेडली. प्रत्यक्षात चालकांना नवे ट्रक मिळालेच नाहीत, असा आरोप दिग्विजयसिंह यांनी केला आहे.
> बँकांचे अडकलेले पैसे
बँक ३१ मार्च २०१५ कर्ज
बँक आॅफ महाराष्ट्र८५० कोटी
ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स२८५ कोटी
बँक आॅफ बडोदा२२३ कोटी
स्टेट बँक आॅफ इंडिया१८९ कोटी
अलाहाबाद बँक११३ कोटी
बँक आॅफ इंडिया९१ कोटी
आंध्रा बँक ८९ कोटी
कॉर्पाेरेशन बँक८५ कोटी
युनियन बँक आॅफ इंडिया ८२ कोटी
पंजाब नॅशनल बँक७० कोटी
इंडियन ओव्हरसीज बँक४८ कोटी
सिडबी ३० कोटी
स्टेट बँक आॅफ त्रावणकोर१५ कोटी
२१७० कोटी