Rohit Pawar News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अशातच, भाजपच्या महिला नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. याबाबत 2 दिवसांपूर्वी तक्रार करुनही कुणावर कारवाई झाली नाही, त्यामुळे स्वत: सदर राज्यमंत्र्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जात अधिकाऱ्यांना जाब विचारला. या घटनेवर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस(शप) चे आमदार रोहित पवार यांनीदेखील यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
या घटनेबाबत रोहित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. यात ते म्हणतात, 'राज्यात महिला सुरक्षेची स्थिती दिवसेंदिवस खालावत असून मुक्ताईनगर येथे केंद्रीय राज्यमंत्री यांच्या मुलीसोबत घडलेला प्रकार निंदनीय आहे. टवाळखोरांनी शासकीय सुरक्षा असतानाही मुलींची काढलेली छेड हे प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे लक्षण नाही का? इतकं होत असतानाही सरकार मात्र निव्वळ राजकीय पतंगबाजी करण्यात व्यस्त आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अद्दल घडेल अशाप्रकारची कारवाई करावी व राज्यभरात महिला सुरक्षेबाबत सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात, ही विनंती.'
एकनाथ खडसे काय म्हणाले?केंद्रीय मंत्र्यांच्या घरातल्या मुलीसोबत हा प्रकार घडल्याने विरोधकांनी सरकारवर धारेवर धरले आहे. या घटनेबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, 'हा प्रकार दुर्दैवी आहे. हा सामाजिक प्रश्न आहे. अलीकडच्या काळात राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुक्ताईनगरमध्ये ही घटना घडली त्यातील हे टवाळखोर गुंड आहेत. त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहे. घटनास्थळी पोलीस होता, त्याला गुंडानी मारहाण केली. पोलिसांचा धाक गुंडावर नाही का..? मुलींची छेड काढणे, त्यांचे फोटो काढणे, सगळे गुंड एकत्रित आले त्यामुळे मुली घाबरल्या. पोलीस होते मात्र त्यांनाही मारहाण झाली. रक्षाताई या केंद्रीय मंत्री आहेत, त्यासोबत मुलीच्या आई आहेत. त्यांच्यासोबत अशा घडत असतील तर सर्वसामान्य मुलीचे काय? हा प्रश्न उभा राहतो', असे एकनाथ खडसे म्हणाले.
राज्यात जंगलराज, काँग्रेसची बोचरी टीका
महाराष्ट्र आता महिला मुलींसाठी सुरक्षित राहिला नाही हे स्पष्ट झाले आहे. हे महाराष्ट्रात जंगलराज आल्याचे चिन्ह आहे. राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांमुळे राज्याची मान शरमेने खाली गेली असून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? पाहा... रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते; मुख्यमंत्री संतप्त