'मी गोपीनाथ मुंडे बोलतोय, तुम्ही उदयनराजेंना अटक केली हे खरे आहे का ?'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 04:44 PM2017-07-28T16:44:25+5:302017-07-28T17:40:04+5:30

1999 साली उदयनराजेंना अटक करण्याचं धाडस करणारे तत्कालीन आयपीएस अधिकारी  सुरेश खोपडे यांनी संपुर्ण घटनाक्रम उलगडला आहे

Retired IPS Officer Suresh Khopade FB post on Udayanraje Bhosale arrest | 'मी गोपीनाथ मुंडे बोलतोय, तुम्ही उदयनराजेंना अटक केली हे खरे आहे का ?'

'मी गोपीनाथ मुंडे बोलतोय, तुम्ही उदयनराजेंना अटक केली हे खरे आहे का ?'

googlenewsNext
ठळक मुद्देउदयनराजेंना 1999 मध्ये खुनाच्या आरोपात अटक झाली होतीअटक करण्याचं धाडसं करणारे तत्कालीन आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांना यासंबंधीची आठवण शेअर केली आहेफेसबूकच्या माध्यमातून सुरेश खोपडे यांनी अटकेचा संपुर्ण घटनाक्रम उलगडला आहे

मुंबई, दि. 28 - उद्योजकाच्या हत्येचा प्रयत्न तसेच खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात मंगळवारी सकाळी ९ वाजता स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले अवघ्या सात तासांत बाहेरही आले. दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सायंकाळी ४ वाजता जिल्हा न्यायालयाने त्यांना काही अटींवर तात्पुरता जामीन मंजूरही केला. या दोन दिवसांमध्ये संपुर्ण साता-यासहित महाराष्ट्रातही उदयनराजेंची अटक हा एकमेव मुद्दा चर्चेवर होता.

पण उदयनराजेंना अटक होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधी 1999 सालीदेखील त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना अटक करण्याचं धाडस करणारे तत्कालीन आयपीएस अधिकारी  सुरेश खोपडे यांना यासंबंधीची आठवण शेअर केली आहे. फेसबूकच्या माध्यमातून सुरेश खोपडे यांनी अटकेचा संपुर्ण घटनाक्रम उलगडला आहे. 

यावेळी ज्याप्रमाणे उदयनराजेंच्या अटकेनंतर कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, त्याचप्रमाणे तेव्हाही परिस्थिती अशाच प्रकारे चिघळली होती. सुरेश खोपडे यांनी हातात अटकेची ऑर्डर आल्यापासून ते बदलीपर्यंतचा सगळा प्रवासच एका प्रकारे सांगितला आहे. विशेष म्हणजे त्यावेळी उदयनराजेंना अटक करु नये, असा फोन तत्कालीन गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी केल्याचा उल्लेखही खोपडे यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. 

सुरेश खोपडे यांनी काय लिहिलं आहे पोस्टमध्ये - 

उदयन राजेंची अटक.

खा.श्री उदयन राजेंना अटक व सुटका हि बातमी वाचली न पोलीस अधीक्षक असतानाची मला ती सातारा मधील पहाट आठवली. 11 सप्टेंबर 1999 रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी देशभर खळबळ उडवून देणारी घटना घडली ......

ती घटना माझे पुस्तक "नवी दिशा -पोलीस प्रशासनाची "(२००३) मध्ये सविस्तरपणे प्रकाशित झालेली आहे .तिचा आशय पुढील प्रमाणे ---त्या पहाटे एक फिर्याद माझ्या हातात देन्यात आली .होती नव्हती ती झोप उडाली .नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाल्याचे व युती सरकार मधील एक राज्य मंत्री व छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज श्री उदयन राजे हे त्यात प्रमुख आरोपी दाखवले होते .एवढी मुद्देसूद ,संक्षिप्त,व परिपूर्ण फिर्याद मी उभ्या नोकरीत पहिली नाही.नंतर समजले की ती 11 वकिलांनी एकत्र बसून बनवली होती . 

त्यानंतर बातमी मिळाली की श्री अभयसिंह राजे (श्री उदयन राजेंचे चुलते ) यांचे नेतृत्त्वाखाली हजारेक लोकांचा जमाव जमला असून आरोपी उदयन राजेंना अटक केली नाही तर सातारा पेटेल अशी धमकी दिली जात आहे .त्याच वेळी दुसरी बातमी धडकली कि राणी साहेब(श्री उदयन राजेंची आई ) यांचे सोबत मोठा जमाव जमलाय व राजेंना अटक केली तर शहर पेटेल अशा घोषणा देतोय .प्रचंड तणाव वाढला .तीन तासानंतर मतदान सुरु होणार होते. 

मोठीच गँभिर परिस्थिती होती . मग मी खुर्चीवर डोळे मिटून बसलो .शहर पटलेलं,लाठीमार, अश्रूधुर, गोळीबार... मग दंगलीची न्यायालयीन चौकशी।... त्या मध्ये मी पिंजऱ्यात उभा.तिथं पोलिसदल,सातारा पोलिस व माझा बचाव करतोय ...हे डोळ्या पुढून सरकले ,आणि उत्तर सापडले!!अटक केली तरी दंगल होणार नाही केली तरी दंगल होणार .अटक करून दंगल झाली तर कायद्याचे पालन केल्याचे श्रेय मिळणार होते नाही तर कर्तव्य च्युतीचा ठपका आला असता.

Dy s p मुत्याल, इन्स्पेक्टर सुर्वेना सूचना दिल्या .उदयन राजे हजर झाले ."why have u called me here ?"आल्या बरोबर त्यांनी प्रश्न केला .मी फिर्याद वाचून दाखवली."हे सर्व साफ खोटं आहे एसपी साहेब.तुम्ही नवीन आहात .हे कुभांड माझे चुलते अभयसिंह राजेंनी रचलेले आहे.आमचा जुना वाद चालू आहे ...वगैरे."आम्ही गोळा केलेला पुरावा त्यांना सांगितला. झुंजूमुंजू होई पर्यंत वाद चालला ."मी निर्दोष आहे.मी निघालो"असे ते म्हणाले.

मग मी बजावले "Mr Udayan Raje you cannot go, now you are under arrest !

त्यांना क्राईम ब्रँच मध्ये ठेवणात आले .राणी साहेब मोठा मोर्चा घेऊन आल्या.राणी साहेब फार कडक व आक्रमक स्वभावाच्या आहेत अशी माहिती पुरविण्यात आली होती .राणी साहेबांची सर्व बाजू ऐकून घेतली .आमचे लोक बघून घेतील ...वगैर असा त्यांचा आक्रमक पवित्रा होता.मीही माझी बाजू सांगितली. तुमच्या लोकांनी गडबड केली तर ते गुन्हे तुम्ही व तुमच्या मुलाने घडविले असे आरोप होतील.तुमच्या अडचणी वाढतील तुमच्या लोकांना घरी जाऊन शांत रहायला सांगा .मधेच फोन वाजत होते .प्रदिर्घ चर्चेनंतर राणी साहेबा मधील एक आई जागृत झाल्याचे मला जाणवले.

पुन्हा फोन खनानला " मी महाराष्ट्राचा गृह मंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतोय "पलीकडून आवाज आला."गुड मॉर्निंग सर "मी.

खोपडे तुम्ही उदयन राजेंना अटक केली हे खरे आहे का? " .

"होय सर" मी .

"का? "

फिर्यादी मध्ये त्यांचे नाव आहे त्या शिवाय ........

"उद्या फिर्यादी मध्ये माझे नाव टाकले तर मलाही अटक करणार का? "

शिवाय तीन प्रत्यक्ष साक्षीदार आहेत,हिंसक जमावा मध्ये ते होते अशी आमची खात्री पटलेली आहे .........उद्या माझ्या विरुद्ध खोटे साक्षीदार उभे केले तर मलाही अटक करणार का? यू आर अल्व्हेज अगेन्स्ट मी अँड माय पार्टी " (नांदेड एसपी असताना आमची वादावादी झाली होती.मुंडे साहेब हे खरे तर एक उमदा व मोठ्या मनाचा माणूस होते पण अधिकाऱ्यांशी वागण्याची त्यांची एक स्टाईल होती )

खोपडे मला माहित आहे तुम्ही बारामतीचे आहात व राष्ट्रवादीचे बगलबच्चे आहात" पलीकडून फोन आपटल्याचा आवाज आला .मीडिया,डिजिपी ऑफिस,राजकारणी यांचेफोन,राणी साहेब इतरांशी चर्चा चालू असता एक स्पेशल ड्युटी शिपाई कानाजवळ कुजबुजला

"सर लोकांच्या मध्ये चर्चा आहे की राजाला दोन खून माफ असतात इथे तर एकच खून झालाय !

एव्हाना मतदान सुरु झाले होते .शरद लेवेंची प्रेत यात्रा दोन हजारावर लोकांसह तणावात सुरु झाली.स्मशानात जाण्याऐवजी प्रेत माझ्या कार्यालयाच्या दारात ठेवले.अभयसिह राजेंनी जमावा पुढे भाषण केले की "मुख्य आरोपीला अद्याप अटक केलेली नाही व केली असल्यास आरोपीला बेड्या घातलेल्या अवस्थेत जमावाला दाखवा त्या शिवाय आम्ही प्रेत हलविणार नाही !"

मग मी जमाव पुढे भाषण केले

"मुख्य आरोपीला आम्ही अटक केलेली आहे.पाच जणांचे शिष्टमंडल येऊन खात्री करू शकते.पण बेड्या घातलेल्या अवस्थेत आरोपीला दाखविण्याची प्रथा नाही व मी दाखवणार नाही "

त्यावर अभयसिंह राजेनीं भाषण केले 

"बेड्या घातलेल्या अवस्थेत आरोपी दाखविल्या शिवाय आम्ही प्रेत हलविणार नाही .सुरेश खोपडे हे एसपी बीजेपी व शिवसेना धार्जिणे आहेत .आमचे सरकार आल्यावर त्यांच्याकडे बघून घेऊ !"

मतदान पार पडले .एक मंत्री व छत्रपतींचे वारसांना अटक करून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही हे पाहून युपी व बिहारच्या निवडणूक निरीक्षकांनी मला मिठी मारली .पण रात्रीच्या बातम्यात निवडणूक आयोगान कलेक्टर सातारचे अभिनंदन केले .

युतीचा सरकार जाऊन आघाडीचे सरकार आले .आमच्या बारामतीचे श्री अजित पवार सातारचे पालक मंत्री बनले.सुरेश खोपडे हा शिवसेना बीजेपी चा माणूस आहे असे ठरवून निवडणुकी नंतर 3 महिन्यात व एकूण नोकरी 7 महिन्यात माझी सातारा मधून उचल बांगडी झाली .बदली का केली याचे उत्तर ना सरकाने दिले ना इलेक्शन कमिशनने !

सातारा पोलीस दलाने निरोप दिला . त्यातील दोन शेरे आजही लक्षात आहेत .एकजण म्हटला "साहेब दीड दिवस तुम्ही एकाच खुर्चीवर बसून होता पण तुम्ही एकदाही कुणावर रागावला नाही . दुसरा म्हणाला "एवढं काम केल्यावर तुमची बदली व्हायला नको होती . तरी पण एस पी ला पाठीचा कणा असतो हे तुम्ही दाखवून दिलेत .निवृत्ती वेतना इतकेच ते शेरे महत्वाचे वाटतात !

Web Title: Retired IPS Officer Suresh Khopade FB post on Udayanraje Bhosale arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.