‘रिलायन्स’-‘टाटा’त रंगले शीतयुद्ध
By Admin | Updated: June 19, 2014 03:01 IST2014-06-19T03:01:54+5:302014-06-19T03:01:54+5:30
रिलायन्स आणि टाटा या दोन प्रतिस्पर्धी कंपन्या वीज दराच्या स्पर्धेमुळे आमने-सामने असतानाच आता त्यांच्यात वीज वितरण जाळ्यावरूनदेखील ‘शीतयुद्ध’ रंगले आहे.

‘रिलायन्स’-‘टाटा’त रंगले शीतयुद्ध
मुंबई : मुंबईच्या उपनगरातील वीज ग्राहकांना विजेचे वितरण करणाऱ्या रिलायन्स आणि टाटा या दोन प्रतिस्पर्धी कंपन्या वीज दराच्या स्पर्धेमुळे आमने-सामने असतानाच आता त्यांच्यात वीज वितरण जाळ्यावरूनदेखील ‘शीतयुद्ध’ रंगले आहे.
गेल्या आर्थिक वर्षात पसरविलेल्या ३३६ किलोमीटर लांबीच्या वीज वितरण जाळ्याचे सक्षमीकरण झाल्याचा दावा टाटा पॉवरने केला असतानाच रिलायन्सदेखील वीज वितरण जाळ्याच्या तपशिलाचा पाढा वाचत आपणही कसे पुढे आहोत? याचे गोडवे गायले आहे. उपनगरातील वीज गाहक एकमेकांकडे खेचण्यासाठी या दोन्ही प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये वाद आहे. टाटा पॉवरची वीज रिलायन्सपेक्षा स्वस्त असल्याने उपनगरातील छोटे ग्राहक टाटाकडे आकर्षित होत आहेत. उलटपक्षी उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या विजेच्या दराबाबत रिलायन्सचे दर कमी असून, टाटाचे त्यापेक्षा अधिक आहेत. या प्रतिस्पर्धी कंपन्यांमधील ‘तु तू मैं मैं’ शिगेला पोहोचले आहे की, प्रसिद्धिपत्रके काढत त्यांनी एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
टाटा पॉवरचे कार्यकारी संचालक अशोक सेठी यांनी याबाबत सांगितले की, मुंबईत वीज वितरणासाठी खूप कमी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात आला आहे.
रिलायन्सच्या प्रवक्त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाटाकडून उपनगरातील वीज ग्राहकांना जी वीज वितरित केली जात आहे; त्यात रिलायन्सच्या वीज वितरण जाळ्याची भूमिका मोलाची आहे. शिवाय रिलायन्सचे उपनगरात २९ लाख ग्राहक आहेत. या वीज ग्राहकांची मागणी १ हजार ७५० मेगावॅट एवढी आहे. शिवाय रस्त्यांवरील दिव्यांसाठी रिलायन्सने तब्बल ३१ किमी वीज वितरणाचे जाळे उभारले आहे. तसेच उच्च आणि लघुदाब वीज वितरणासाठीही कंपनीचे मोठे जाळे पसरले आहे. (प्रतिनिधी)