दहावीचा रेकॉर्डब्रेक निकाल, राज्याचा निकाल ८८.३२ टक्के
By Admin | Updated: June 17, 2014 13:09 IST2014-06-17T12:46:28+5:302014-06-17T13:09:27+5:30
दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून राज्यातील ८८.३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

दहावीचा रेकॉर्डब्रेक निकाल, राज्याचा निकाल ८८.३२ टक्के
ऑनलाइन टीम
पुणे, दि. १७- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून राज्यातील ८८.३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीने नवा उच्चांक गाठल्याचे आकडा सर्वाधिक असल्याचे शिक्षण मंडळाच्या अधिका-यांनी सांगितले.
शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन १० वीचा निकाल जाहीर केला. यंदा १० वीच्या परीक्षेत राज्यातील १३ लाख ८८ हजार विद्यार्थी बसले होते. बारावीच्या पाठोपाठ दहावीच्या निकालानेही यंदा उच्चांक गाठल्याचे मम्हाणे यांनी स्पष्ट केले. राज्याचा निकाल ८८.३२ टक्के लागल्याचे मम्हाणे यांनी जाहीर केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागानेच बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल ९५.५७ टक्के ऐवढा लागला असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. या विभागाचा निकाल ८१. ६८ टक्के लागला आहे. १०वीच्या परीक्षेतही मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात ९०.५५ टक्के मुली तर ८६. ४७ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना २६ जून रोजी दुपारी शाळांमार्फत गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार असून गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना २६ जून ते ५ जुलै याकालावधीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
विभागनिहाय निकाल
कोल्हापूर- ९३.८३ टक्के, औरंगाबाद- ८७.०६ टक्के, नागपूर- ८२.९३ टक्के, पुणे- ९२.३५ टक्के, अमरावती - ८४.११ टक्के, कोकण - ९५.५७ टक्के, लातूर - ८१.६८ टक्के, नाशिक - ८९.१५ टक्के
ऑनलाइन निकाल या लिंकवर पाहता येईल
www.mahresult.nic.in
www.maharashtraeducation.com