भर पावसात रेल्वे विस्कळीत, मुंबईकरांचे हाल
By Admin | Updated: July 2, 2014 14:47 IST2014-07-02T12:46:03+5:302014-07-02T14:47:07+5:30
भर पावसात कांजूरमार्ग ते कुर्ला स्थानकांदरम्यान गाड्यांची लांबच लांब रांग लागलेली असतानाच रेल्वे अवघ्या २० मिनिटे उशीराने धावत असल्याची चुकीची माहिती रेल्वेतर्फे देण्यात येत आहे.

भर पावसात रेल्वे विस्कळीत, मुंबईकरांचे हाल
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २ - दमदार पावसाची हजेरी त्यात भर म्हणजे कुर्ल्याला सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने हालात पडलेली भर प्रवाशांसाठी डोकुदुखी झालेली असताना मध्य रेल्वेने अत्यंत दिशाभूल करणारी अनाउन्समेंट करत प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप दिला. बुधवारी सकाळी मुंबईसह उपनगरामध्ये पावसानं हजेरी लावली. परंतु सकाळी दहाच्या नंतर कुर्ल्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि पार कांजूरमार्गपर्यंत धीम्या गतीच्या मार्गावर गाड्यांची रांग लागली आणि हजारो प्रवासी भर वाटेत खोळंबले. असे असतानाही रेल्वे मात्र गाड्या १५ ते २० मिनिटे उशीरानं धावत असल्याची धादांत खोटी अनाउन्समेंट करत असल्याचे दिसून आले. परिणामी ठाणे डोंबिवलीतल्या हजारो प्रवाशांनी पुढे जाऊन अडकणा-या गाड्यांमध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतला. कांजूर ते कुर्ला या दरम्यान जवळपास २० ते २२ लोकल्स एकामागे एक अशा दोन तास उभ्या होत्या आणि महिला, वृद्ध व्यक्ती आणि शाला कॉलेजातली मुलं अशा हजारो लोकांनी शेवटी कंटाळून ट्रॅकमध्ये उतरून जवळचे स्टेशन पायी जाण्याची निर्णय घेतला.
कांजूरमार्ग ते कुर्ला दरम्यान गेल्या दोन तासांपासून अनेक लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. मात्र लोकल ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना याविषयी कोणतीही माहिती दिली गेली नाही. लोकलमध्ये पब्लिक अनाउन्समेंट यंत्रणा बसवल्याचा गाजावाजा करण्यात आला मात्र या यंत्रणेच्या माध्यमातूनही प्रवाशांना कुठलीही माहिती देण्यात आली नाही.
दरम्यान, हार्बर मार्गावरही चेंबूर - टिळकनगरदरम्यानही पाणी तुंबल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. वडाळ्याजवळीही सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे वृत्त आहे.
पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाला असून मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. एलबीएस मार्गावर पाणी तुंबल्याने वाहतूक खोळंबली असून, घाटकोपर, सांताक्रूझ येथेही अशीच परिस्थिती असल्याने मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.