पोलीस भरतीचा चौथा बळी विक्रोळीच्या राहुल सपकाळचा मृत्यू
By Admin | Updated: June 15, 2014 02:06 IST2014-06-15T02:06:11+5:302014-06-15T02:06:11+5:30
नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेने आज चौथा बळी घेतला. विक्रोळीला राहणारा राहुल रमेश सपकाळ पाच किलोमीटरचे अंतर धावून पार केल्यानंतर कोसळला

पोलीस भरतीचा चौथा बळी विक्रोळीच्या राहुल सपकाळचा मृत्यू
मुंबई : नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेने आज चौथा बळी घेतला. विक्रोळीला राहणारा राहुल रमेश सपकाळ पाच किलोमीटरचे अंतर धावून पार केल्यानंतर कोसळला होता. मात्र, उपचारांदरम्यान आज सकाळी ९ च्या सुमारास मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात त्याचे निधन झाले.
पोलीस दलात भरती होण्याच्या जिद्दीने राहुल सपकाळ चाचणीसाठी गेला होता. ११ जूनला मैदानी चाचणीसाठी त्याला पूर्व द्रुतगती मार्गावरील भरती केंद्रावर बोलावले होते. सकाळी ७ वाजता केंद्रावर हजर व्हा, असे आदेश पोलिसांकडून त्याला मिळाले होते. त्यामुळे सकाळी ६ च्या ठोक्यालाच राहुल केंद्रावर हजर झाला. प्रत्यक्षात दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याची चाचणी घेण्यात आली. याआधी मृत्यू झालेला विशाल केदारे हा नाशिकचा तरुणही याच राउंडमध्ये सहभागी झाला होता. विशाल थोडे अंतर धावून खाली कोसळला. राहुलने मात्र पाच किलोमीटरचे अंतर पार केले. चाचणी पूर्ण केल्याने त्याला १० गुण मिळाले खरे, मात्र चाचणी पूर्ण केल्यानंतर तो खाली कोसळला.
केंद्रावरील पोलिसांनी राहुलला प्रथमोपचार देऊन मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. विशालही याच रुग्णालयात दाखल होता. दोघांचीही प्रकृती सतत खालावू लागल्याने त्यांना मुलुंडच्या प्लॅटिनम रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील उपचारांमुळेही राहुलची प्रकृती सुधारत नसल्याचे पाहून त्याला फोर्टीस रुग्णालयात दाखल केले. विशाल मात्र प्लॅटिनम रुग्णालयातच उपचार घेत होता. काल विशालचा मृत्यू झाला आणि आज राहुलने अखेरचा श्वास घेतला.
बळी गेल्यानंतर आली जाग
मैदानी चाचणीसाठी पाच किलोमीटरचे अंतर उमेदवारांना धावून पूर्ण करायचे असते. मात्र, ही धावण्याची चाचणी सकाळी ७ ते ९ आणि दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या वेळेत घ्यावी, असा नियम आहे. मग, विशाल आणि राहुल हे दुपारी साडेबारा वाजता कसे काय धावले? या गैरसोयीमुळे कालपर्यंत तीन बळी घेतले. त्यानंतर, पोलिसांनी वेळेनुसार चाचणी घेण्याचे ठरवले.