लोकसभेत राहुल गांधींमुळेच भाजपा विजयी - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: November 10, 2015 09:41 IST2015-11-10T09:40:56+5:302015-11-10T09:41:09+5:30
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या कमकुवत व कुचकामी नेतृत्वामुळे भाजपाचा विजय झाला असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला

लोकसभेत राहुल गांधींमुळेच भाजपा विजयी - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या कमकुवत व कुचकामी नेतृत्वामुळे भाजपाचा विजय झाला, ज्या राज्यात सक्षम नेतृत्व होते तिथे भाजपाला फारसे यश मिळाले नाही असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सदासर्वकाळ निवडणूक जिंकण्याची जादू कोणाकडेच नसते असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर सलग दुस-या दिवशी उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखामधून भाजपावर निशाणा साधला. भाजपाला पाण्यात पाहण्याचे कारण नाही, आमच्याच खांद्यावर घेऊन आम्ही त्यांना महाराष्ट्रात मिरवले आहे अशी आठवण त्यांनी करुन दिली. देशातील जनतेने आशेने मोदी सरकारला निवडून दिले होते. पण अजून महागाई आटोक्यात नाही, व्यापा-यांनी कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे, बिहारसारख्या राज्यातील पराभवामुळे शेअर बाजारात चढउतार होतो, आता देश शेअर बाजारातील सट्टेबाजांच्या मर्जीवर चालणार की काय असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.