पुरोगामी विचारवंत कलबुर्गींची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 00:39 IST2015-08-31T00:39:14+5:302015-08-31T00:39:14+5:30
अज्ञाताने घातल्या गोळ्या : दाभोलकर, पानसरेंनंतर आणखी एक विवेकवादी ठरले बळी

पुरोगामी विचारवंत कलबुर्गींची हत्या
धारवाड /बेळगाव : मूर्तीपूजेविरुद्ध जनजागृती अभियान सुरू केलेले कर्नाटकातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत आणि विद्रोही साहित्यिक डॉ. मल्लेशप्पा एम. कलबुर्गी यांची रविवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते
७७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे तीन मुले आणि एक मुलगी आहे.महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंपाठोपाठ आणखी एका पुरोगामी विचारवंताची हत्या झाल्याने या चळवळीतील कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत हिंदुत्ववादी संघटनांवर संशय व्यक्त केला जात आहे. डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला. त्याच पद्धतीने कलबुर्गी यांच्यावरही हल्ला झाला. धारवाडमधील कल्याणनगर परिसरात कलबुर्गी यांचे निवासस्थान आहे. रविवारी सकाळी दुचाकीवरून दोन अज्ञात हल्लेखोर कलबुर्गी यांच्या घरी आले. त्यापैकी एकजण दुचाकीवर थांबला, तर दुसऱ्या व्यक्तीने आपण विद्यार्थी आहोत, असे सांगून दरवाजा ठोठावला. कलबुर्गी यांनी दरवाजा उघडताच हल्लेखोराने दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी कलबुर्गी यांचे कपाळ भेदून आरपार गेली, तर दुसरी गोळी शरीरात घुसली. त्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी लगेचच दुचाकीवरून पळ काढला. हल्ल्यानंतर कलबुर्गी यांना तत्काळ धारवाडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (प्रतिनिधी)
हिंदुत्ववाद्यांवर संशय
मूर्तीपूजेविरुद्ध डॉ. कलबुर्गी यांनी जागृती अभियान सुरू केले होते. त्यांना काही हिंदुत्ववादी संघटनांकडून धमक्याही मिळाल्या होत्या. पण, त्याकडे कलबुर्गी यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांची हत्या हिंदुत्ववादी संघटनांकडून केली गेली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
बजरंग दलाचे
वादग्रस्त टिष्ट्वट
बजरंग दलाच्या भुवंत शेट्टी याने टिष्ट्वटरवर कलबुर्गी यांच्या हत्येचे समर्थन केले असून, हिंदुत्वाच्या विरोधात लिहिणाऱ्या, बोलणाऱ्यांची हीच गत होईल, अशी धमकीही दिली आहे.
कोल्हापूरचे पथक धारवाडला रवाना
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची रविवारी सकाळी अज्ञाताने गोळ्या घालून हत्या केली. कलबुर्गी आणि ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये साम्य असल्याने कोल्हापूरचे विशेष पथक सकाळी धारवाड येथे रवाना झाले. गेली सहा महिने हे पथक पानसरेंच्या मारेकऱ्यांचा शोध घेत आहे. पानसरे यांचे मारेकरीच कलबुर्गी यांच्या हत्येमागे असावेत, असा संशय कोल्हापूर पोलिसांना आहे. यानुसार हे पथक धारवाडकडे रवाना झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सुरक्षा परत केली
डॉ. कलबुर्गी यांना हिंदुत्ववादी संघटनांकडून जिवे मारण्याची धमकी आल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी त्यांना सशस्त्र सुरक्षा पुरविली होती. त्यासाठी दोन पोलीस कर्मचारी कायम त्यांच्यासोबत राहत होते. पण काही दिवसांपूर्वी डॉ. कलबुर्गी यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आपल्या सुरक्षेसाठी सरकारच्या पैशांचा अपव्यय होत आहे; त्यामुळे सुरक्षा काढून घ्यावी, अशी मागणी केली होती. त्या आधारे पोलीस प्रशासनाने त्यांची सुरक्षा काढून घेतली होती.