पृथ्वीराज चव्हाणांच्या गच्छंतीच्या बातमीवरून रंगले चर्चांचे फड
By Admin | Updated: June 12, 2014 15:04 IST2014-06-12T15:02:16+5:302014-06-12T15:04:00+5:30
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पदावरून गच्छंती होणार असल्याची चर्चा आज सकाळपासूनच रंगली होती.

पृथ्वीराज चव्हाणांच्या गच्छंतीच्या बातमीवरून रंगले चर्चांचे फड
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १२ - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवामुळे विधानसभा निवडणुकांपूर्वीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पदावरून गच्छंती होणार असल्याची चर्चा आज सकाळपासूनच रंगली होती. मात्र राज्यात नेतृत्व बदलाची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली.
एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, राज्यातील दारूण पराभवामुळे पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी नवा चेहरा आणण्यात येणार होता. नवे मुख्यमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील , बाळासाहेब थोरात किंवा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांपैकी एकाची राज्यात वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र माणिकरावांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या असा कोणताही निर्णय होण्याची शक्यता नसून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच मुख्यमंत्रीपदाची धुरा असेल.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून पार खावा लागला. राज्यात पक्षाला अवघ्या दोन जांगा मिळाल्या. या पराभवासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबादार ठरवण्यात येणार होते. पृथ्वीराज चव्हाणांच्या कारभारबद्दल काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनीह नाराजी व्यक्त करत त्यांना हटवण्याच्या मागणी लावून धरली होती. त्याच पार्श्वभूमीवर चव्हाणांची गच्छंती अटळ असल्याचे वृत्त येत होते.
मात्र खुद्द काँग्रेसकडूनच या बातमीचे खंडन करण्यात आल्याने सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.