भाजपाच्या सत्तेने विदर्भवाद्यांच्या आशा पल्लवित
By Admin | Updated: May 28, 2014 00:56 IST2014-05-28T00:56:14+5:302014-05-28T00:56:14+5:30
केंद्रात भाजपाची एकहाती सत्ता आल्यामुळे विदर्भवाद्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भाजपा सुरूवातीपासूनच छोट्या राज्यांचा सर्मथक आहे. त्यातच आता केंद्रात सत्ता आल्याने विदर्भ राज्य

भाजपाच्या सत्तेने विदर्भवाद्यांच्या आशा पल्लवित
आंदोलनाचा अँक्शन प्लॅन : गावोगावी करणार जनजागरण संतोष अरसोड - यवतमाळ केंद्रात भाजपाची एकहाती सत्ता आल्यामुळे विदर्भवाद्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भाजपा सुरूवातीपासूनच छोट्या राज्यांचा सर्मथक आहे. त्यातच आता केंद्रात सत्ता आल्याने विदर्भ राज्य निर्मितीच्या प्रक्रियेला वेग येईल, असा सूर उमटू लागला आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आला. मात्र विदर्भाच्या वाट्याला सतत उपेक्षाच आली. पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विदर्भाला कधीच झुकते माप दिले नाही. विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांनी विदर्भाची बाजू कधीच लावून धरल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळ्या विदर्भाच्या बाजूने होता. मात्र या विषयावर ते कधीच आक्रमक झाले नाहीत. अशातच तेलंगणा राज्य निर्मिती झाली आणि वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नाने पुन्हा उचल खाल्ली. मागील वर्षी वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर मतदान घेण्याचे अभिनव आंदोलन अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आदी शहरात घेण्यात आले. या जनमत चाचणीत जनतेने उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला. शिवसेना वगळता अनेक महत्वाच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपला सहभाग नोंदविला. या चाचणीने वेगळ्या विदर्भाच्या बाजूने कौल दिला. नागपूर अधिवेशना दरम्यान घेण्यात आलेली जनमत चाचणी आणि अभिरूप विधानसभा यामुळे खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीसुध्दा विदर्भावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली होती.आता तर केंद्रात भाजपाचे सरकार आले आहे. त्यातच नितीन गडकरींसारख्या विदर्भवादी नेत्याची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या संयुक्त महाराष्ट्रवादी भूमिकेला आता पाहिजे तशी किंमत राहील असे वाटत नसल्यामुळे वेगळ्या विदर्भाचा मार्ग मोकळा होईल असे चित्र निर्माण झाले आहे. या वातावरणाचा फायदा घेऊन वेगळ्या विदर्भाची चळवळ पुन्हा जोर पकडणार आहे.