पोलिसही हादरले, हताश झाले
By Admin | Updated: September 3, 2014 01:43 IST2014-09-03T01:43:34+5:302014-09-03T01:43:34+5:30
युगच्या अपहरणाचा छडा लावण्यासाठी शहर पोलिसांनी कसलाही कसूर केला नाही. माहिती मिळाल्यापासूनचे २६ तास पोलीस सारखे धावपळ करीत होते. युगला सहीसलामत शोधण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले.

पोलिसही हादरले, हताश झाले
युगचा मृतदेहच दाखविण्याची वेळ आली : जंग जंग पछाडले
नागपूर : युगच्या अपहरणाचा छडा लावण्यासाठी शहर पोलिसांनी कसलाही कसूर केला नाही. माहिती मिळाल्यापासूनचे २६ तास पोलीस सारखे धावपळ करीत होते. युगला सहीसलामत शोधण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. मात्र, पोलिसांना यश आले नाही. युगला सहीसलामत त्याच्या पालकांच्या हवाली करण्याऐवजी त्याचा मृतदेहच त्याच्या पालकांना दाखविण्याची दुर्दैवी वेळ पोलिसांवर आली. आरोपीने युगची हत्या केल्याची कबुली देताच अवघी पोलीस यंत्रणा हादरली. कर्तव्यकठोर पोलिसही हताश झाले.
युगचे अपहरण झाल्याचे कळाल्यापासून शहर पोलीस दलातील कर्मचारी, अधिकारी अक्षरश: वेडावल्यागत युगचा शोध घेत होते. नागपूर, कामठी, कन्हान, खापरखेडा, पारशिवनी, सावनेर, खापा, काटोल, जलालखेडा, बुटीबोरीसह अनेक गावांत युगची शोधाशोध सुरू होती. नागपूर शहर आणि जिल्हाच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्याच्या पोलिसांनाही युगच्या अपहरणाची माहिती देऊन स्थानिक पोलिसांनी त्याच्या शोधासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. युगचे छायाचित्र आणि अपहरणकर्त्यांचे वर्णनही कळविण्यात आले होते. मिळेल त्या प्रत्येकच माहितीला पोलीस गंभीरपणे तपासात होते.
राजेश, अरविंद सिंगला अटक
राजेश नामक या संशयिताने युगची हत्या करून मृतदेह रस्त्याच्या पुलाखाली लपविल्याचे सांगताच पोलीसही हादरले. त्यांनी लगेच त्याला घेऊन घटनास्थळ गाठले. कोराडीपासून साधारणत: १० किलोमीटर अंतरावर बाबुळखेडा गाव आहे. या गावाजवळच्या रस्त्यावर जंगली भागात एक नाला वाहतो. त्याच्या पुलाखाली आरोपींनी युगचा मृतदेह लपवला होता. आरोपी राजेशने तो दाखवताच पोलीसही सुन्न पडले. युगचा मृतदेह सापडताच पोलीस आयुक्तांसह सर्वांनाच माहिती कळविण्यात आली. त्यामुळे बहुतांश वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. मुकेश टावरी यांना घेऊन रात्री घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी युगचा मृतदेह मेयोत आणला. मध्यरात्रीपर्यंत पोलिसांची प्रक्रिया तेथे सुरू होती. दरम्यान, अपहृत युगची हत्या झाल्याचे कळाल्याने शोकसंतप्त नागरिकांचा प्रचंड जमाव मेयो आणि लकडगंज ठाण्यात धडकला होता. याच दरम्यान, पोलिसांनी आरोपी राजेश डावरे आणि अरविंद सिंग यांना अटक केल्याचे कळाल्याने त्यांना आमच्या हवाली करा, अशी जमावाची मागणी होती. जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य छडीमार करावा लागला.
तपास यंत्रणेची सूत्रे कोतवालीत
लकडगंज ठाण्यात पत्रकार तसेच अन्य मंडळींची वर्दळ होणार, हे ध्यानात घेऊन पोलीस अधिकाऱ्यांनी तपास यंत्रणा कोतवालीतून हलवली. पोलीस उपायुक्त ईशू सिंधू, निर्मलादेवी एस. आणि अभिनाश कुमार यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात आज दुपारी २ च्या सुमारास परिमंडळ ३ आणि ४ च्या ठाणेदारांना बोलवून घेतले. लकडगंजपासून एमआयडीसीपर्यंतचे काही चांगले कर्मचारी अधिकारीही तपासासाठी कामी लावले. दुपारी ४ वाजेपर्यंत युगच्या अपहरणाशी संबंधित आरोपींचा छडा लावण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. विविध अँगल तपासण्यात आले. त्यानंतर पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी सर्वच वरिष्ठांना लकडगंज ठाण्यात बोलावून घेतले. त्यानुसार सहआयुक्त अनुपकुमार सिंग, उपायुक्त ईशू सिंधू आणि अभिनाश कुमार लकडगंज ठाण्यात पोहोचले.
भीती खरी ठरली
अपहरणाच्या प्रकरणात जसजसा वेळ जातो, तसतशी अपहृत व्यक्ती जिवंत सापडण्याची आशा मावळते. पोलिसांचा हा नेहमीचाच अनुभव आहे. त्यामुळे आज सायंकाळी पत्रकारांशी बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकारी चिंताग्रस्त होते. युग किंवा त्याच्या अपहरणकर्त्यांचा छडा अद्याप लागला नाही. २४ तासांपेक्षा जास्त वेळ झाला. त्यात युग आरोपींना ओळखतो त्यामुळे जास्त धोका असल्याचे अधिकारी सांगत होते. त्यांच्या बोलण्यातील भीती स्पष्ट जाणवत होती. ती अखेर खरी ठरली.
गुरुवंदना सुन्न
लकडगंज ठाण्यापासून अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावर गुरुवंदना अपार्टमेंट आहे. सुखवस्तू कुटुंबाच्या या सहनिवासात सोमवारी सायंकाळपासूनच तीव्र अस्वस्थता होती. या सहनिवासातील गोंडस असा युग बेपत्ता झाला होता. दोन अडीच तास होऊनही त्याचा पत्ता लागत नव्हता. नंतर त्याचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने डॉ. मुकेश चांडक यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सहनिवासातील रहिवासी अक्षरश: हादरले होते. चिमुकल्या युगच्या हत्येची माहिती कळताच गुरुवंदना अपार्टमेंटसमोर चांडक यांचे आप्तस्वकिय, पोलीस आणि मित्रमंडळींसोबतच मोठ्या संख्येत बघ्यांची गर्दी जमणे सुरू झाले. गुरुवंदना अपार्टमेंटच्या परिसरातील वातावरण अक्षरश: सुन्न झाले होते. एवढ्या गोंडस मुलाला कोणतेही कारण नसताना कुणी निर्दयपणे कसे ठार मारणार, असा प्रश्न अनेकांना अस्वस्थ करीत होता. त्याचे रूपांतर संताप आणि आक्रोशात झाले. अनेक राजकीय नेतेदेखील युगच्या घराजवळ पोहोचले होते.