शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

"एरवी जोंधळे आपण सगळेच पाहतो; पण त्याला लागलेले दाणे म्हणजे चांदणे आहे, हे फक्त महानोरच म्हणू शकतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 09:31 IST

"बहिणाबाईंच्या साहित्याचा त्यांच्यावर फार प्रभाव होता. त्यातूनच एरवी जोंधळे आपण सगळेच पाहतो; पण त्याला लागलेले दाणे म्हणजे चांदणे आहे हे फक्त महानोरच म्हणू शकतात, असे माजी आमदार, उल्हास पवार यांनी म्हटले आहे."

निसर्गाशी एकरूप होऊन काव्यलेखन करणारे ज्येष्ठ कवी, लेखक ना. धों. महानोर (वय ८०) यांचे गुरुवारी सकाळी पुण्यात निधन झाले. पुणे येथील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मूळ गावी पळसखेडे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनानंतर, विविध क्षेत्रांतील लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आठवणींना उजाळा देत आहेत....

ना.धों. महानोर आणि मी एकाच वेळी (सन १९७८ ते १९८४) विधान परिषदेचे आमदार होतो. मला साहित्याची मनापासून आवड, त्यामुळे सुरुवातीपासूनच आमचे मैत्र जमले ते अगदी कालपर्यंत कायम होते. हाडाचा शेतकरी आणि हाडाचा कवी असेच त्यांचे वर्णन मी करेल. सभागृहातील त्यांची भाषणे अतिशय पोटतिडकीने, तळमळीने केलेली असत. ते बोलायला लागले की सभागृह शांत होत असे. गावगाड्याविषयी विलक्षण प्रेम असलेला माणूस होता हा. 

बहिणाबाईंच्या साहित्याचा त्यांच्यावर फार प्रभाव होता. त्यातूनच एरवी जोंधळे आपण सगळेच पाहतो; पण त्याला लागलेले दाणे म्हणजे चांदणे आहे हे फक्त महानोरच म्हणू शकतात, असे माजी आमदार, उल्हास पवार यांनी म्हटले आहे.

‘प्रकृती’च्या प्रवाहात ‘ओलिते’ करणारी प्रतिभा - महानोर दादांची आणि माझी पहिली भेट मी विद्यार्थी होतो, तेव्हा जालना येथे एका कविसंमेलनात झाली होती. त्या पहिल्या भेटीपासून त्यांच्याशी आत्मिक संबंध राहिले. पीकपाण्यावर प्राण टाकणारा हा कवी होता. त्यांचे शब्द जितके गोड होते, तेवढाच त्यांचा गळाही गोड होता. त्यांची कविता कागदावर उतरण्याआधी ते कंठातूनच येत असे. त्यांना स्वतंत्र एखाद्या प्रसंगाच्यानिमित्ताने गीत लेखन करण्याची गरजच पडली नाही. सहजता हीच त्यांच्या काव्य लेखनाची प्रकृती राहिलेली आहे. निसर्गालाही आपण प्रकृती म्हणूनच ओळखतो. त्या अंगाने कवी महानाेर हे प्रकृती प्रधान कवी होते. प्रकृतीच्याच प्रवाहाने संस्कृती वाहत असते. त्या प्रवाहात चिंब होऊन त्यांची प्रतिभा एखाद्या ‘ओलिते’सारखी नेहमीच उत्कृष्ट करत आलेली आहे.- फ. मुं. शिंदे, माजी अध्यक्ष अ. भा. साहित्य संमेलन 

 मैत्री अशी हवी -ना. धों. महानोर आणि मी सन १९७८ मध्ये राज्यात एकाच वेळी आमदार होतो. त्यावेळी माझी महानोरांबरोबर मैत्री झाली. त्यांचे मला लगेच जाणवलेले एक वैशिष्ट्य म्हणजे अजातशत्रुत्व. त्यांची नियुक्ती शरद पवार यांनी केली होती. त्यामुळे त्यांचे शरद पवार एके शरद पवार सुरू असायचे. मात्र, शरद पवार यांचा राजकीय शत्रू किंवा त्यांच्या विरोधात कोण काही बोलले तर तेही आपले शत्रू असा महानोरांचा स्वभाव नव्हता. ते सर्वांबरोबरच मित्रत्वाच्या नात्याने बोलायचे.- डॉ. कुमार सप्तर्षी, माजी आमदार

मराठी कवितेतील हिरवं रान उजाडलं. त्यांचं अवचित जाणं म्हणजे आनंदाचं गाणं हरपल्यासारखं आहे.  डाॅ. विठ्ठल वाघ, लाेककवी

‘जैत रे जैत’ चित्रपटाची सगळी गीते त्यांनी लिहिली आहेत. तेव्हा माझा आणि त्यांचा घनिष्ठ परिचय झाला. तेव्हा आम्ही सारखे भेटत नव्हतो; तरी भेटल्यावर एकमेकांची आपुलकीने चौकशी करणे, प्रसंगी मदत करणे होत होते. ते शारीरिक यातनांमधून सुटले; पण त्यांची गाणी त्यांची आठवण म्हणून राहणार आहेत.डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते -

बालकवी, बहिणाबाई या परंपरेतले, पण स्वत:ची वेगळी अनुभूती आणि अभिव्यक्ती असलेल्या महानोरांनी मराठी कवितेला अनोखे रूपसौंदर्य आणि भावसौंदर्य दिले.  वसंत आबाजी डहाके, ज्येष्ठ कवी -

पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या रूपाने शेती, माती, पाण्याच्या हिरव्या बोलीला प्रतिभेचे अत्युच्च कोंदण देणारे निसर्गकवी आपल्यातून निघून गेले आहेत. त्यांना शब्दकळेची अलौकिक दैवी देणगी लाभली होती आणि तिचा वापर केवळ काव्यरचनेसाठी न करता आयुष्यभर त्यांनी शेतकऱ्यांच्या जगण्यात चार आनंदाचे क्षण पेरण्यासाठी तिचा वापर केला. माझ्याशी, तसेच दर्डा परिवाराशी त्यांचा स्नेह होता. भेट झाली की कवितांबद्दल चर्चा करायचे. वैयक्तिक आयुष्यातील सुख-दु:खाचे प्रसंग सांगायचे. पत्नी सुलोचनावहिनींच्या निधनानंतर त्यांना एकाकी वाटत होते, पैलतीराचे वेध लागले होते. आज ते कविता व गीतांच्या रूपाने आठवणींचा अमूल्य, चिरंतन ठेवा आपल्या हाती देऊन अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली   - डॉ. विजय दर्डा, माजी राज्यसभा सदस्य तथा चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड 

महानोर यांचे प्रकाशित साहित्य -कवितासंग्रह रानातल्या कविता (१९६७), वही (१९७०), पावसाळी कविता (१९८०), अजिंठा - दीर्घ कविता (१९८४), प्रार्थना दयाघना (१९९०), पक्ष्यांचे लक्ष थवे (१९९०), पानझड (१९९७), तिची कहाणी (१९९९), गाथा शिवरायांची (१९९९), जगाला प्रेम अर्पावे (२००४), गंगा वाहू दे निर्मळ (२००७), वाहटूळ (२०१३)

संपादन -पळसखेडची गाणी - लोककवितांचे संपादन (१९८०), पुन्हा कविता (१९६५), पुन्हा एकदा कविता (१९८४), बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची निवडक कविता (२०१४)

कथा, कादंबरी, ललित -गांधारी - कादंबरी (१९७२), गावातल्या गोष्टी - कथासंग्रह (१९८२), यशवंतराव चव्हाण आणि मी (१९९०), पु. ल. देशपांडे आणि मी (२०००), शरद पवार आणि मी (२००५), ऐसी कळवळ्याची जाती (१९९४), त्या आठवणींचा झोका (२००३), गपसप - लोककथा संग्रह (१९७२), रानगंधाचे गारूड - पत्रव्यवहार (२००८), गाव गारूड - नाटक (२०१२), कवितेतून गाण्याकडे (२०१७), रानगंध (२०२२) 

शेतीविषयक लेखन  -- शेतकरी दिंडी (१९८०), शेतीसाठी पाणी (१९८४), जलसंधारण, फळबागा, ठिबक (१९८२), सीताफळ बागेची गोष्ट (२००५), दिवेलागण (२००७), शेती, आत्मनाश व नवसंजीवन (२००७), या शेताने लळा लाविला (२०१५), विधिमंडळातून (२०१६).- शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘हा काळोखाचा रस्ता आपला नाही’ ही लेखमाला त्यांनी लिहिली होती. त्याची तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली होती. 

चित्रपट गीतलेखन - जैत रे जैत (१६ गीतरचना, १९७८), सर्जा (१९८४), एक होता विदूषक (१३ गीतरचना, १९९३), अबोली (१९९४), मुक्ता (१९९५), दोघी (१९९६), थांग (२००५), मालक (२०१५), उरूस (२००८), अजिंठा (१३ गीतरचना, २०१२)

पुरस्कार -१९९१ : भारत सरकारचा पद्मश्री२००० : साहित्य अकादमी पुरस्कार१९८५ : महाराष्ट्र सरकारचा कृषिभूषण पुरस्कार १९९८ : केशव कोठावळे पुरस्कार२००० : पु. ल. देशपांडे काव्य पुरस्कार २००३ : निसर्गरत्न पुरस्कार२००४  : कृषिरत्न पुरस्कार२०११ : जनस्थान पुरस्कार, नाशिक २०११ : अनंत भालेराव पुरस्कार, औरंगाबाद २०१३ : विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार२०१३ : मराठवाडा साहित्य परिषद जीवन गौरव पुरस्कार २०१४ : भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जीवन गौरव

भूषविलेली अध्यक्षपदे -अखिल भारतीय साहित्य मंडळ १९८५ ते १९८८ मराठवाडा साहित्य परिषद १९८४ ते १९८८ बालकवी जन्मशताब्दी १९९० कवी गिरीश जन्मशताब्दी १९९५ कऱ्हाड साहित्य संमेलन १९९५ मराठवाडा साहित्य संमेलन, परळी १९९६ 

सदस्यत्व -- विधान परिषदेवर दोन वेळा राज्यपाल नियुक्त आमदार - १९७८ ते १९८४ आणि १९९० ते १९९५ - कला अकादमी, महाराष्ट्र - १९९३ ते १९९६ - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - १९८४ स्थापनेपासून.- साहित्य अकादमी, नवी दिल्ली - १९९० ते १९९६- साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य - १९८४ ते १९९४ - विश्वकोश मंडळ, महाराष्ट्र राज्य - १९९० ते १९९४ - महाराष्ट्र शासन चित्रपट, नाट्य व सांस्कृतिक कार्य - १९७८ ते १९८४ - दक्षिण मध्य सांस्कृतिक क्षेत्र - १९८३ ते १९८६. 

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Songsमराठी गाणी