पंढरपूर/कोल्हापूर/नागपूर : सततच्या पावसाने पंढरपुरातील चंद्रभागा, कोल्हापुरातील पंचगंगा नदीला पूर आला आहे. पेरण्या खोळंबलेल्या विदर्भातील जिल्ह्यांनाही हलक्या ते मध्यम पावसाने दिलासा दिला आहे.
प. महाराष्ट्रातील उजनी व वीर धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे निरा नरसिंहपूर येथून भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.
हे पाणी पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीपात्रात पोहोचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत असून पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला.
चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. वीर व उजनी धरणांची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीर धरणातून नीरा नदीत, तर उजनी धरणातून भीमा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे.
विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाची प्रतीक्षाच
कोल्हापूरमधील राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ३१००, वारणातून १३ हजार ७७४ तर दूधगंगेतून १४ हजार १८७ घनफूट पाण्याचा विसर्ग, नद्यांंच्या पातळीत वाढ.
पंचगंगा नदीची पातळी ३४ फुटांपर्यंत पोहोचली असून तिथे इशारा (३९ फूट) पातळीकडे आगेकूच सुरू केल्याने कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण ४०% भरले. सांगलीत ४ दिवस संततधार पाऊस.
नंदूरबार जिल्ह्यात सलगच्या पावसाने भिंती कोसळल्याच्या घटना. दोन जखमी.
बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प कोरडा, जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम.
अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात केवळ १२ टक्के जलसाठा शिल्लक.
विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा दिलासा, मात्र प्रकल्पांमध्ये केवळ ३० टक्के साठा.
मराठवाड्यातील प्रकल्पात केवळ ३२ टक्के साठा आहे. जोरदार पावसाची प्रतीक्षा.