आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
By सोमनाथ खताळ | Updated: June 12, 2025 10:23 IST2025-06-12T10:21:43+5:302025-06-12T10:23:16+5:30
Pandharpur Wari: ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता विठूनामाचा गजर करत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून १ हजार ७९ दिंड्यांतून १२ लाख ३४ हजार वारकरी ६ जुलैच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालायला सुरुवात झाली आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
- सोमनाथ खताळ
बीड - ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता विठूनामाचा गजर करत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून १ हजार ७९ दिंड्यांतून १२ लाख ३४ हजार वारकरी ६ जुलैच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालायला सुरुवात झाली आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य विभागाने नियोजन करत प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर २०३ ‘आपला दवाखाना’ स्थापन करण्यात आला आहे. तसेच ४६ ठिकाणी १० खाटांचे तात्पुरते आयसीयूदेखील
स्थापन केले आहे. आषाढी वारी, पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी ५ व १९ मे रोजी बैठका झालेल्या आहेत. आता १२ जून रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे याचा आढावा घेणार आहेत.
१,१५५ मनुष्यबळ
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जवळपास १,१५५ मनुष्यबळाचे नियोजन केले आहे. यात १६१ विशेषतज्ज्ञ, २८६ डॉक्टर यांच्यासह नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, फार्मासिस्ट, आदींचा समावेश आहे.
खासगीच्या १० खाटा आरक्षित
शासकीय आयसीयू, आपला दवाखाना यांसोबतच पालखीमार्गावर असणाऱ्या प्रत्येक खासगी रुग्णालयातही १० खाटा आरक्षित ठेवण्याच्या सूचना पुणे उपसंचालकांनी दिल्या आहेत. तसेच दिंड्यांसाेबत २९० आरोग्यदूत असणार आहेत.
ठळक बाबी कोणत्या?
आरोग्यदूत २९०
स्त्रीरोग तज्ज्ञ १५
मुक्काम स्थळी हिरकणी कक्ष ३७
दिंडीप्रमुखांना औषधी किट ३५००
रुग्णवाहिका ३३१
आयसीयू कक्ष ४६
आपला दवाखाना २०३
पालखी सोहळ्याचे नियोजन झाले आहे. वारकऱ्यांचे हाल होणार नाहीत, त्यांना आरोग्यसेवा तत्पर मिळावी, यासाठीच ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
- डॉ. आर. बी. पवार, उपसंचालक, पुणे
६६ जणांना अटॅक, ४२६ जणांना कुत्रा चावला
सन २०२४ मध्ये १५ लाख १२ हजार ७७४ वारकऱ्यांवर उपचार केले होते.
यांत ५,४६७ जणांना ॲडमिट केले होते. ४,९५० जणांना रेफर केले; तसेच २,६६७ जणांना सारी, २४,७९३ आयएलआय, १६,९२८ अतिसार, ७,८६०, जुलाब, ४४,९८२, ताप, ६६ हार्ट अटॅक, २८७ अपघातांत जखमी, ४२६ कुत्रा चावला, ११ सर्पदंश इतर
१४ लाख ९ हजार २८७ रुग्णांचा समावेश होता.