सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आदेश दिले होते. परंतू, पावसाळा असल्याने ते शक्य नव्हते. यामुळे पावसाळ्यानंतर या निवडणुका राज्यात घेतल्या जाणार आहेत. या दृष्टीने महापालिकांची प्रभागरचना करण्यासाठी राज्यसरकारने आदेश दिले आहेत. यामधून मुंबईला मात्र वगळण्यात आले आहे.
महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना हे आदेश देण्यात आले आहेत. अ, ब आणि क वर्गाच्या महानगरपालिकांच्या प्रभागांची पुन्हा नव्याने बहुप्रभाग रचना करण्यात येणार आहे. याला काही महिन्यांचा वेळ लागणार असला तरी त्यानंतर लगेचच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना होणाऱ्या महापालिकांत पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबईसह नऊ महापालिका आहेत.
महत्वाचे म्हणजे यातून मुंबईला वगळण्यात आले आहे. मुंबईत जुन्याच प्रभागरचनेनुसार निवडणूक होणार आहे. यामागेही मोठे राजकारण झाले होते. महायुती आणि मविआच्या प्रभाग रचनांच्या राजकारणात सर्वोच्च न्यायालयाने २३६ प्रभागांवरून पुन्हा २२७ प्रभाग केल्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली होती. यामुळे मुंबईसोडून इतर महापालिकांत नवीन प्रभागरचना केली जाणार आहे. फडणवीस सरकारच्या पहिल्या काळात बहुसदस्य प्रभाग पद्धती अवलंबण्यात आली होती. तीच आता फडणवीस सरकार पुन्हा सत्तेत असल्याने कायम ठेवण्यात आली आहे. ठाकरे सरकारने या पद्धतीला विरोध करत ती रद्द केली होती. परंतू, आता पुन्हा होणाऱ्या निवडणुका या महायुतीच्या सत्तेत होत असल्याने राज्यात मुंबई सोडून इतरत्र बहुसदस्यीय प्रभाग पद्धत राबविली जाणार आहे.
यानुसार या महापालिकांत चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत. तसेच ड वर्गात जिथे चार सदस्य होणार नाहीत तिथे पाच, तीन सदस्यांची प्रभाग पद्धती अवंलबिली जाणार आहे.
अ वर्ग महानगरपालिका – पुणे, नागपूरब वर्ग महानगरपालिका – ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवडक वर्ग महानगरपालिका – नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली
ड वर्गात या महापालिकांचा समावेश...अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, संगाली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना या महापालिका ड वर्गात मोडतात.