चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांचाही सहभाग; दानवेंनी नावंच सांगितली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 12:44 IST2025-03-25T12:20:57+5:302025-03-25T12:44:09+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बेटिंग झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांचाही सहभाग; दानवेंनी नावंच सांगितली
Ambadas Danve: न्यूझीलंडचा चार विकेट्स राखून भारतीय क्रिकेट संघाने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चं जेतेपद पटकावत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. जगभरातून क्रिकेटप्रेमींकडून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत होता. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे होतं. मात्र आता विधानपरिषदेचे नेते अंबादास दानवे यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्याबाबत गंभीर आरोप केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान सट्टा लावल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये मुंबईतील काही पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता असंही अंबादास दानवे म्हणाले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा परिषदेत पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात बेटिंग झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केली. त्यानंतर आता इंडियन प्रिमियर लीगच्या सामन्यांमध्येही सट्टा लावण्यासाठी मुंबईत बैठका झाल्याचे अंबादास दानवे म्हणाले. यामध्ये मुंबई पोलिसांच्या बड्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. आयपीएलच्या बेटिंगसाठी काही व्यक्ती मुंबईत आल्याची माहिती अंबादास दानवे यांनी सभागृहाला दिली. यावेळी अंबादास दानवे यांनी एक पेन ड्राईव्ह देखील सादर केला.
काय म्हणाले अंबादास दानवे?
"लोटस् २४ नावाचे क्रिकेट बेटिंग अॅप आहे. यातील मेहुल जैन, हिरेन जैन आणि कमलेश जैन हे बेटिंग करतात. पाकिस्तानातल्या लोकांची खेळाडूंची यांचे संबंध आहेत आणि संपर्कात सुद्धा आहेत. ते खुलेआम मुंबईतल्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक करतात. चॅम्पियन ट्रॉफी संपल्यानंतर आता आयपीएलसाठी ते दुबईवरून मुंबईत आले आहेत. या पेन ड्राइव्हमध्ये त्यांनी पाकिस्तानात बॅटिंगसाठी काय काय केलेलं आहे हे तुम्ही ऐका. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव घेतले आहे ते तुम्ही तपासा. खुलेआम पोलिसांच्या सहाय्याने अशा प्रकारच्या घटना या राज्यात घडत आहेत," असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.