पाच जणांच्या मृत्यूस पालिकाच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 02:16 IST2016-11-04T02:16:50+5:302016-11-04T02:16:50+5:30
महापालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून डेंग्यू व मलेरियाच्या साथीमुळे सामान्य शहरवासीयांना जीव गमवावा लागला आहे.

पाच जणांच्या मृत्यूस पालिकाच जबाबदार
नवी मुंबई : महापालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून डेंग्यू व मलेरियाच्या साथीमुळे सामान्य शहरवासीयांना जीव गमवावा लागला आहे. तुर्भे नाक्यावर एक महिन्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करून न घेतल्यामुळे एका महिलेचा रिक्षामध्येच मृत्यू झाला असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होवू लागला आहे.
डेंग्यूमुळे तुर्भे नाक्यावर पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच शहरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली असता ही घटना महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच झाल्याचे निदर्शनास आले आहे. हनुमान नगरमध्ये राहणाऱ्या गीता प्रसाद या महिलेला ताप येवू लागल्याने नाक्यावरील डॉक्टरकडे उपचारासाठी नेले होते. परंतु ताप कमी होत नसल्याने डॉक्टरने त्यांना रूग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला.
गीता यांचे पती श्रीचंद यांनी तत्काळ वाशी मनपा रूग्णालयात नेले. पण तेथील डॉक्टरांनी गंभीर काही नसल्याचे कारण देवून रूग्णास घरी घेवून जाण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशीही प्रकृती खालावल्यामुळे पुन्हा रूग्णालयात नेल्यानंतरही अॅडमिट करून घेतले नाही. तिसऱ्या दिवशी प्रकृती गंभीर झाल्याने पुन्हा रूग्णालयात घेवून जात असताना रिक्षामध्येच मृत्यू झाला.
तुर्र्भे परिसरामधीलच शंकरी हलदार यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. भाऊबीजेच्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली. नाक्यावरील सर्व रूग्णालये बंद असल्यामुळे त्यांनी वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयात नेले. परंतु तेथील व्यवस्थापनानेही सुटी असल्याचे कारण देवून त्यांना रूग्णालयात दाखल करून घेतले नाही. परिणामी उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला.
ध्रुपदा रोहिदास गवळी, पल्लवी गायकवाड व प्रेम भालेकर यांनाही योग्य उपचार मिळाले नसल्यामुळे मृत्यू झाला आहे. शहरात डेंग्यू व मलेरियाने थैमान घातले आहे. नागरिकांचा जीव जात असताना महापालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. अविश्वास ठराव दाखल झाल्यामुळे तुकाराम मुंढे गांभीर्याने लक्ष देत नाहीत.
लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना आयुक्तांच्या भीतीने अधिकारी ऐकत नाहीत. या भांडणामध्ये नागरिकांचा जीव जात असल्याने तुर्भे नाका परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
>तुर्भेत आरोग्य सुविधेचा अभाव
तुर्भे नाका हनुमाननगर, आंबेडकरनगर, गणेशनगर, बोनसरी व इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरात महानगरपालिकेचे एकही नागरी आरोग्य केंद्र नाही. तुर्भे गावात असलेले माता बाल रूग्णालयही काही महिन्यांपूर्वीच बंद झालेले आहे. पालिका रूग्णालयाची सुविधा नाही व खासगी रूग्णालयातील उपचार परवडत नसल्याने झोपडपट्टीतील रूग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
>डेंग्यू व मलेरियाची स्थिती गंभीर आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही योग्य दखल घेतली जात नसल्याने नागरिकांचा मृत्यू होवू लागला आहे.
- अमृत मेढकर,
सामाजिक कार्यकर्ते