महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. कारण मतदार राजाने मतदानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. यामुळे जे उमेदवार निवडून येतील ते कमी मतफरकाने असणार आहेत. यामुळे सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांमध्येही धाकधुक आहे. आज महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ४३ टक्केच मतदान झाले आहे.
उन्हाची तीव्रता जास्त असल्याने मतदानावर परिणाम झाला आहे. तसेच महाराष्ट्रात राजकीय धुरळाच एवढा उडाला आहे की मतदारही पाठ फिरवू लागले आहेत. दुपारी ३ वाजेपर्यंत वर्ध्यात ४५.९५%, अकोला ४०.६९%, अमरावती ४३.७६%, बुलढाणा ४१.६६%, हिंगोली ४०.५०%, नांदेड ४२.४२%, परभणी ४४.४९% आणि यवतमाळ मध्ये ४२.५५% मतदान झाले आहे.
संध्याकाळी ५ वाजताचे आकडे यायचे आहेत. यानंतर एक तास म्हणजे सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या काळात राजकीय पक्ष मतदारांना घराबाहेर काढू शकले तर ठीक नाहीतर मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार आहे.
यवतमाळमधील हिवरी मतदारसंघामध्ये तर मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी लंच टाईमचा अर्धा तास ब्रेक घेतला होता. यामुळे येथील मतदारांना त्यांचे जेवण होण्याची वाट पाहत बसावे लागले होते. काही ठिकाणी ईव्हीएम नादुरुस्तीचेही प्रकार घडले आहेत. यामुळेही मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार आहे. अधिकचे मतदान झाले तर त्यात सत्ताधाऱ्यांना दिलासा असतो, कमी मतदान झाले तर सत्ताधाऱ्यांना त्याचा फटका बसतो असे राजकीय तज्ञांचे मत आहे. यामुळे जर कमी मतदान झाले तर त्याचा फटका कुणाला बसणार असा प्रश्न चर्चिला जात आहे.
त्रिपुरामध्ये सर्वाधिक ६९ टक्के मतदान झाले आहे. १३ राज्यांतील ८८ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. एकूण 16 कोटी मतदारांसाठी 1 लाख 67 हजार मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी 102 जागांवर मतदान झाले होते. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी मतमोजणीनंतर येणार आहेत.