लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात निवड व वेतन श्रेणीअंतर्गत ४० हजार शिक्षकांचीऑनलाइन प्रशिक्षण यंत्रणा पहिल्याच दिवशी कोलमडली. यात शिक्षकांच्या उपस्थितीची नोंदच पूर्ण झाली नाही आणि लिंकही काम करेनाशी झाली. त्यामुळे राज्यभरातून शिक्षकवर्ग हैराण झाले. या पार्श्वभूमीवर शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी शासनाच्या ढिसाळ नियोजनावर टीका केली. यंत्रणेतील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सुरू आहे. मात्र, शिक्षकांनीसुद्धा नियोजित वेळेत हजर राहून सहकार्य करणे आवश्यक असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर यांचे म्हणणे आहे.
या प्रशिक्षणासाठी राज्यात शेकडो, तर मुंबईत सात सेंटर सुरू करण्यात आले आहेत. मुंबईतील प्रत्येक केंद्रात ५५ प्रशिक्षणार्थी आहेत. मात्र, सर्व्हर डाउन झाल्याने अनेकांना प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे २ ते १२ जूनपर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षणात पहिल्या दिवशी चारऐवजी दोनच धडे शिकवले गेले. मात्र, नियोजनाअभावी हजारो शिक्षकांचा वेळ वाया गेला, अशी तक्रार आता करण्यात येत आहे. मात्र, प्रशिक्षणासाठी वेळेत येऊन शिक्षकांनी सहकार्य करायला हवे. सकाळी ९:१५ वाजता वेळेत हजर राहणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रशिक्षणादरम्यान उच्च प्राथमिकचे शिक्षक माध्यमिकला, तर माध्यमिकचे शिक्षक उच्च प्राथमिक गटात निवडले गेले. त्यामुळे अनेकांना या प्रशिक्षणानंतर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.-ज. मो. अभ्यंकर, शिक्षक आमदार
सुट्ट्या लक्षात घेऊन प्रशिक्षणाचे नियोजन व्हायला हवे होते. मात्र, तांत्रिक समस्येमुळे शिक्षक, प्रशिक्षक सर्वांनाच मनस्ताप झाला.-महेंद्र गणपुले, मुख्याध्यापक संघटना
तांत्रिक समस्या सोडविण्याचे पूर्णपणे प्रयत्न केले जात आहेत. लवकरच ही समस्या दूर होऊन प्रशिक्षण सुरळीत होईल. शिक्षकांनी देखील वेळेचे पालन आणि सहकार्य करणे जरुरी आहे.-राहुल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद