नितीशकुमारांचा राजीनामा म्हणजे नौटंकी - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: May 20, 2014 09:28 IST2014-05-20T09:26:06+5:302014-05-20T09:28:53+5:30
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेला राजीनामा म्हणजे नौटंकी असल्याची बोचरी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

नितीशकुमारांचा राजीनामा म्हणजे नौटंकी - उद्धव ठाकरे
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २० - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेला राजीनामा म्हणजे नौटंकी असल्याची बोचरी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात दारुण पराभव होऊनही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खुर्ची सोडायला तयार नाहीत असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
लोकसभेचा निकाल लागल्यापासून बिहारमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. तर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसच्या गोटातूनच केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळताच नितीशकुमारांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली. धर्मनिरपेक्षतेचा फालतू बाऊ केल्याने नितीशकुमारांना बिहारमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. नितीशकुमार एनडीएत राहिले असते तर आज त्यांना लोकसभेत यशही मिळाले असते व त्यांचे दिल्लीतील राजकीय वजनही वाढले असते असेही त्यांनी स्पष्ट केले.
नितीशकुमारांचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवरही टीका केली आहे. महाराष्ट्र, आसाम अशा बहुसंख्य भागात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा द्यायला हवा. पण काँग्रेस नेते खुर्ची सोडणार असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
आपसाठी नीतीमत्ता म्हणजे चणा - शेंगदाण्याचे दुकान
आम आदमी पक्षासाठी जनादेश म्हणजे पोरखेळ असून नीतीमत्ता म्हणजे त्यांना चणे-शेंगदाण्याचे दुकान वाटते. म्हणूनच आधी नैतिकतेच्या मुद्यावर दिल्लीची सत्ता सोडणारा आम आदमी पक्ष लोकसभेनंतर पुन्हा एकदा दिल्लीत सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करतो अशी टीका ठाकरेंनी केली आहे.