...तर राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे- दिग्विजय सिंह

By Admin | Updated: May 24, 2016 20:58 IST2016-05-24T20:58:31+5:302016-05-24T20:58:31+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसला सल्ले देण्याची काहीही आवश्यकता नाही

NCP should merge with Congress: Digvijay Singh | ...तर राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे- दिग्विजय सिंह

...तर राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे- दिग्विजय सिंह

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 24-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसला सल्ले देण्याची काहीही आवश्यकता नाही. जर त्यांना काँग्रेसची इतकीच काळजी वाटत असेल तर त्यांनी पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करावे, असे प्रतिपादन काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केले आहे. सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यास चुकीचा संदेश जाईल असे वक्तव्य राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तारिक अन्वर यांनी केले होते. यावर सिंह यांनी नागपूरात पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले.
५ राज्यांच्या विधानसभा निवडणूकांमध्ये कॉंग्रेसची पिछेहाट झाल्यानंतर आता पक्षात सर्जरीची आवश्यकता आहे. या मतावर मी आजही कायम आहे. कॉंग्रेसमध्ये तरुणांना जास्तीत जास्त प्रमाणात जोडण्याची आवश्यकता आहे, याचा पुनरुच्चार दिग्विजय सिंह यांनी केला. मोदी सरकारची २ वर्षे पूर्ण होत आहेत, परंतु विकास मात्र कुठेच दिसला नाही. आता २ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीला होणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन करणार आहेत. केंद्र सरकारने कामे तर केलेली नाहीत, परंतु बच्चन यांचा उपयोग करून स्वत:चा प्रचार-प्रसार करत आहेत. २६ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघात जाऊन मी तेथे खरोखर किती विकास झाला आहे, हे पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राम नाईकांकडून अपेक्षाच नाही
उत्तर प्रदेशात बजरंग दलाकडून स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात शस्त्रे चालविण्याचेदेखील प्रशिक्षण देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी याला योग्य म्हटले होते. यावर दिग्विजय सिंह यांनी टीका केली आहे. बजरंग दल, संघ यांचे निर्माणच हिंसेतून झाले आहे. त्यांच्याशी जुळलेल्या राम नाईक यांच्याकडून इतर विचारांची अपेक्षा करुच शकत नाही, असे सिंह म्हणाले.

मी माफी मागणार नाही
बाटला एन्काऊन्टर बनावट होते या माझ्या वक्तव्यावर मी कायम आहे व यात माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असे सिंह यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी. त्यातून सर्व बाबी समोर येतील. मोठा साजिद, छोटा साजिद कोण आहेत, याची मला काहीही माहिती नाही, असेदेखील ते म्हणाले.

Web Title: NCP should merge with Congress: Digvijay Singh